लक्ष्मीकांत पार्सेकर : पेडणे तालुक्यातील दोन स्वातंत्र्यसैनिकांचा गणपत पार्सेकर महाविद्यालयातर्फे सत्कार
वार्ताहर /हरमल
गोव्याच्या मुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी जीवाची व कुटुंबियांची पर्वा न करता रणांगणात उडी घेत पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले अशा स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करून त्यांच्या त्यागाची महती भावी पिढी व शिक्षकांना करून देणे उचित आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
गोवा मुक्तीदिन हीरक महोत्सवी वर्षानिमित्त गणपत पार्सेकर महाविद्यालयात आयोजित पेडणे तालुक्मयातील दोन स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. राज्यातील जनतेला गोवा मुक्तीपूर्व व नंतर काय काय उपलब्धी झाल्या याची जाणीव आहे. पूर्वीच्या काळी सही करण्याइतपत शिक्षण उपलब्ध होते, मात्र गोवा मुक्तीनंतर शाळा, महाविद्यालये शिवाय शिक्षक निर्माण करणाऱया संस्था ग्रामीण भागात उभ्या राहिल्या. गावोगावी ज्ञानदानाचे कार्य कित्येक संस्था इमानेइतबारे करीत असल्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले.
सत्कारमूर्ती संजय प्रभुदेसाई व नकुल नारूळकर या दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांनी खडतर परिस्थितीत मुक्तीसाठी लढा दिला. पोर्तुगीजाकडून कारावास भोगला, अत्याचार सोसला, मात्र ध्येयापासून विचलित झाले नाही. आज त्यांची कर्तबगार मुले विविध पदांवर कार्यभार सांभाळून स्वातंत्र्याची फळे चाखतात व हुतात्मावादी कार्य केलेल्या सैनिकांच्या कार्याला विस्मृतीत जाऊ न देणे हे कर्तव्य मानीत आहेत. त्यांच्या त्यागाची महती व त्यांच्या कार्याचा गौरव प्रत्यक्ष अनुभवण्याचा क्षण अनमोल असतो. स्वातंत्र्य सैनिक संजय प्रभुदेसाई व नकुल नारूळकर यांच्या भावी वाटचालीसाठी चेअरमन पार्सेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी हरमल पंचक्रोशी संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याहस्ते गौरव केला. यावेळी पार्सेकर महाविद्यालयाचे प्राचार्य उदेश नाटेकर, विद्याप्रबोधिनीचे प्राचार्य भूषण भावे, दोन्ही स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते. प्राचार्य नाटेकर यांनी महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले मात्र स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार हा कधीही न विसरणारा सोहळा गोव्याच्या हिरक महोत्सवी वर्षात करण्याचा योग आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृती प्रिय राज्याचा ठेवा अबाधित ठेवण्याचे आवाहन प्राचार्य नाटेकर यांनी केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी रुचिरा लाड व रश्मिता बाणावलीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता लोटलीकर तर प्रा. रेणुका परदेशी यांनी आभार मानले.