- महापौर मुरलीधर मोहोळ यांचे गौरवोद्गार
ऑनलाईन टीम / पुणे :
स्वातंत्र्यपूर्व काळात उत्सव सार्वजनिक स्वरुपात व्हावे, याकरीता लोकमान्य टिळकांनी चळवळ उभी केली. त्याचा परिणाम स्वातंत्र्याच्या योगदानामध्ये दिसून आला. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील लोकमान्यांना अभिप्रेत असे कार्य गणेश मंडळांकडून सुरु आहे. सामाजिक भान जपत अविरतपणे कर्तव्याच्या भूमिकेतून हे कार्य सुरु असून उत्सव साजरा करण्यासोबत समाज अडचणीत असताना मदत देखील मंडळे करीत आहेत, असे गौरवोद्गार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
प्रभात मित्र मंडळतर्फे गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौकातील नाकोडा भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रभात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुरदाळे, मेजर बजरंग निंबाळकर (निवृत्त), मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सवप्रमुख अविनाश निरगुडे, ओंकार नाईक आदी उपस्थित होते. हुतात्मा ॠषिकेश जोंधळे यांच्या मातोश्री कविता जोंधळे आणि हुतात्मा संभाजी राळे यांचे वडिल ज्ञानेश्वर राळे यांनी पुरस्कार स्विकारला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरु होत आहे. भारतीयांच्या मनात देशाच्या सिमेवर लढणा-या सैनिकांसाठी संवेदना आहे. देशाचे रक्षण करणा-यांच्या प्रती मनात अभिमानाची भावना आहे. सैनिकांच्या कार्याचा आदर्श आपण नव्या पिढीसमोर ठेवायला हवा.
संजय मुरदाळे म्हणाले, आपल्याला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेले नाही. भारताचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. मात्र, आपल्याला शाळेमध्ये गुलामगिरीचा इतिहास मोठया प्रमाणात सांगितला जातो. त्यामुळे नव्या पिढीला आपला पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास सांगायला हवा, असेही त्यांनी सांगितले. बजरंग निंबाळकर म्हणाले, सैनिक खूप कठिण परिस्थितीमध्ये काम करतात. त्यामुळे सामान्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी असायाला हवे.
किशोर चव्हाण म्हणाले, सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे सैनिकांसोबत त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानणे, हे आपले कर्तव्य आहे. तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रभावना निर्माण व्हावी, या मूळहेतूने मंडळ कार्यरत असून विविध उपक्रम राबविले जातात. प्रभात शौर्य पुरस्काराच्या माध्यमातून सैनिकांच्या शौर्याची आणि कुटुंबाची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार नाईक यांनी आभार मानले.