कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने तज्ञ लोकांची मदत घ्यावी आणि यात विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही सामील केले जावे. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठय़ा संकटाला देश सामोरा जात असल्याचे विधान आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे.
2008-09 च्या जागतिक आर्थिक संकटावेळी मागणीत घट झाली होती, परंतु आमच्या कंपन्यांचा विकासदर वर्षागणिक वाढत होत राहिला. भारताची वित्तीय यंत्रणाही बळकट होती. परंतु आता अशी स्थिती नसल्याचे राजन म्हणाले.
साधनसामग्री आणि अधिकारांचा वापर करून योग्य तोडगा तसेच प्राधान्य निश्चित करून कोरोनावर मात करता येऊ शकते. अशा प्रयत्नांद्वारे कोरोनाच्या आर्थिक प्रभावातूनही बाहेर पडता येणार आहे. अधिकाधिक चाचणी करून विषाणूचा फैलाव रोखणे सद्यकाळात सर्वात आवश्यक आहे. क्वारेंटाईन आणि सोशल डिस्टंसिंगचे कठोर पालन केले जावे असे राजन यांनी म्हटले आहे.
योजना आखण्याचा काळ टाळेबंदीनंतर विषाणूचा फैलाव न थांबल्यास काय करावे याची योजना आखली जावी. खबरदारी बाळगत कमी संसर्ग असणाऱया भागांमध्ये काही प्रमाणात हालचाली सुरू करण्याचा विचार केला जावा. कामाच्या ठिकाणी वसतिगृहांमध्ये राहणाऱया सुदृढ तरुणांद्वारे याची सुरुवात होऊ शकते असे राजन यांनी सुचविले आहे.