कृषी विधेयकाला दर्शवला तीव्र विरोध आंदोलनात शेतकऱयांचा मोठा सहभाग
प्रतिनिधी/ सातारा
केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरीविरोधी कृषि विधेयक महाराष्ट्रात लागू करू नये या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात शेतकऱयांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.
संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यावेळी बोलताना म्हणाले, शेतमालाला चांगली किंमत मिळावी, लवकरात लवकर ग्राहक मिळावा यासाठी या कृषीविधेयक महाराष्ट्रात लागू केले जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पण याबद्दल काही आक्षेपही आहेत. एपीएमसीबाहेर विक्री झाल्यास ‘बाजार शुल्क’ न मिळाल्याने राज्यांचे नुकसान होईल. बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडते यांचे काय होणार?
विधेयक कंत्राटी शेतीबद्दल बोलते. शेतकऱयांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल. त्यासाठी किंमतही ठरवता येईल. मुळात केंद्र शासनाने आणलेले हे विधेयक शेतकरीविरोधी असून ते महाराष्ट्रात लागू करू नये अशी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. त्यासाठीच आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात अशाच पद्धतीने आंदोलन सुरू असून शेतकऱयांची मागणी मान्य न झाल्यास देशभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
रस्ता रोको आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य सदस्य अर्जुनभाऊ साळुंखे, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, संजय जाधव, ऍड विजय चव्हाण ऍड. सतिश कदम, राजू घाडगे, उमेश घाडगे, मोहन घाडगे हेमंत खरात, जनार्दन आवारे, महादेव डोंगरे, अमोल साळुंखे, दत्ता पाटील, गणेश काळोखे व कार्यकर्ते शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.