उदगाव / वार्ताहर
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास बळ,पाठींबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुबुद्धी येऊ दे यासाठी 3 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन कार्यकर्त्यांसोबत करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
केंद्र सरकारने देशातील अन्नदात्या शेतकऱ्यावर तीन कृषी कायदे जे लागले आहेत, ते अन्यायी असून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. यासाठीच गेल्या सात दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये येऊन कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन केले आहे. मात्र केंद्र सरकार यावर अजूनही वेळकाढू भूमिका घेत आहे.
दिल्लीमध्ये देशातील शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. यावेळी रात्री खर्डा भाकरी खाऊन ,भजन कीर्तन करत रात्रभर जागर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला सुबुद्धी दे व शेतकर्यांना न्याय मिळवून दे यासाठीच हे आंदोलन करण्यात येणार असून देशाचा अन्नदाता जगला पाहिजे यासाठी सर्वच जनसामान्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. जर राजकीय पक्षांना नेत्यांना शेतकऱ्यांबाबत प्रेम असेल तर त्यांनीदेखील रात्री 12 नंतर या आंदोलनात उपस्थित राहून पाठिंबा द्यावा असेही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हणाले.