प्रतिनिधी/ सातारा
एफआरपीनुसार ऊस दर मिळावा, शेतकऱयांचा संपूर्ण सातबारा कोरा व्हावा याकरता स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामीण भारत बंद आहे. हा सरकारला इशारा आहे. सरकारने योग्य ती लवकरात लवकर कारवाई करावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साताऱयात बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको नंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पिंजरा गाडीत बसवून नेले अन् पुन्हा सोडून दिले. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, धनंजय महामुलकर, रमेश पिसाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे सर्व्हीस रोडवरुन जाणारी वाहतुक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी आंदोलनकर्त्यांना लगेच आंदोलन उरकते घेण्याच्या सुचना दिल्या. त्यावेळी मीडियाशी बोलताना राजू शेळके म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारत बंद आहे. हा सरकारला इशारा आहे. शेतकऱयांचा सातबारा कोरा झाला पाहिजे.त्याकरता महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाने मदत करावी, संपूर्ण सातबारा कोरा करण्याच आश्वासन सत्तेवर येण्याअगोदर सरकारने दिल होत ते पाळल जावं. एफआरपीचा जो कायदा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी. कारखानदारांची मनमानी पद्धत चालणार नाही, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आपला हिसका दाखवेल. तसेच विजबील माफीची नुसतीच घोषणा केली आहे. शेतकऱयांच्या माथी बोगस बिले दिलेली आहेत. प्रचंड शेतकऱयांच्या डोक्यावर बोजा झाला आहे. शासनाने आधार द्यावा अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देवू, असा इशारा दिला आहे.