दहा तास दिवसाची वीज द्यावी अशी मागणी
सांगली/प्रतिनिधी
सक्तीचे वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसाची वीज द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून आंदोलन करत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
द्राक्षपिक विमा योजना सक्षम करावी
पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी द्राक्षबागाना आवरण कागदासाठी अनुदान द्यावे. रासायनिक खते, कृषी साहित्य व पशुखाद्य दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. सक्तीची वीज कनेक्शन तोडणे बंद करून १० तास दिवसाची वीज द्यावी. भूमी अधिग्रहण कायदा पुर्वीप्रमाणे लागू करावा. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान सत्वर द्यावे या मागण्या ही यावेळी करण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.