धर्मसिंह सैनी यांचाही समावेश ः निवडणुकीपूर्वी भाजपमधून नेत्यांचे पलायन
वृत्तसंस्था / लखनौ
भाजपला रामराम ठोकणारे स्वामीप्रसाद मौर्य आणि धर्मसिंह सैनी यांच्यासह 8 आमदारांनी शुक्रवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. परंतु दारासिंह चौहान हे शुक्रवार दुपारपर्यंत समाजवादी पक्षात दाखल झाले नव्हते. सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 8 आमदारांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. स्वामीप्रसाद मौर्य ज्या पक्षात जातात, त्याचेच सरकार सत्तेवर येते. यावेळी दिल्लीतून कितीही नेते आले तरीही योगी आदित्यनाथ पास होणार नाहीत. यावेळी सायकलचे हँडल आणि चाकंही नीट आहेत. पॅडल मारणारे लोक आले आहेत. सप सरकार स्थापन होण्यापासून आता कुणीच रोखू शकत नसल्याचे अखिलेश म्हणाले.
समाजवादी पक्षात प्रवेश करताच मौर्य यांनी भाजपवर प्रखर टीका केली आहे. आता भाजप सरकारचा खात्मा करून उत्तरप्रदेशला भाजपच्या शोषणापासून मुक्त करायचे आहे. अखिलेश यांच्या मदतीने भाजपला नेस्तनाबूत करणार आहे. अखिलेश हे युवा असून सुशिक्षित नेते असल्याचे स्वामीप्रसाद यांनी म्हटले आहे.
मायावतींना अहंकार
मी ज्याची साथ सोडतो, त्याचा ठावठिकाणा राहत नसल्याचे सांगू इच्छितो, याचे उदाहरण बसप अध्यक्षा मायावती आहेत. त्यांना अहंकार झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही त्यांना विसर पडला, त्या काशीराम यांना विसरल्या. परिवर्तन आंदोलनाचा नारा बदलण्यात आला. थैली असलेल्या लोकांच्या मागे त्या उभ्या राहिल्या. मी साथ सोडताच त्यांची अवस्था काय झाली हे माहित असेलच असे स्वामीप्रसाद यांनी म्हटले आहे.
5 टक्के लोकांनाच सत्तेचा लाभ
भाजपचे मोठमोठे नेते कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेले होते. या नेत्यांना कधीच आमदार आणि मंत्र्यांशी बोलण्यास वेळ मिळत नव्हता. आम्ही लोकांनी राजीनामा दिल्यावर त्यांची झोप उडाली आहे. सध्या सत्तेत केवळ 5 टक्के लोकांना लाभ मिळतोय. आता 80 आणि 20 ची लढाई नव्हे तर 15 आणि 85 ची लढाई होईल. 85 आमचे आहेत तर 15 मध्ये देखील विभागणी होणार असल्याचा स्वामी यांनी केला आहे. दलित आणि मागासवर्गाने अखिलेश यादवांना मुख्यमंत्री करण्यासाठी संकल्प घेतला आहे. भाजपच्या तुलनेत आम्हाला समाजवादी पक्षात अनेक पटीने सन्मान मिळतोय असे विधान धर्मसिंह सैनी यांनी केले आहे.
योगी आदित्यनाथ लक्ष्य
योगी हे 80 बद्दल बोलतात. समाजवादी आघाडीसोबत 80 टक्के लोक तर पूर्वीपासूनच होते. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार असे भाजपने म्हटले होते, परंतु काहीच घडले नाही. कुठलेच पिक सरकारने खरेदी केले नाही. शेतकऱयांना योग्य स्वरुपात खतांचा पुरवठा झालेला नाही. समाजवादी आणि आंबेडकरवादी लोक मिळून लढल्यास आम्ही यावेळी 400 जागा देखील जिंकू शकतो. जनतेला बदल आणि परिवर्तन हवे आहे. दिल्लीतून कितीही लोक आले तरीही योगी पास होणार नाहीत असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
सपमध्ये सामील झालेले नेते
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत माजी मंत्री धर्मसिंह सैनी, बिल्हौरचे आमदार भगवती सागर, शाहजहांपूरचे आमदार रोशनलाल वर्मा, फिरोजाबादचे आमदार डॉ. मुकेश वर्मा, बांदाचे आमदार बृजेश कुमार प्रजापति आणि सिद्धार्थनगरचे आमदार चौधरी अमर सिंह आणि विनय शाक्य यांनी सपमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर अनेक माजी आमदारांनी सायकलवर स्वार होण्याचा निर्णय घेतला आहे.