योगी सरकारमध्ये होते मंत्री – भाजपला मोठा झटका -10-12 आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. राज्याचे कॅबिनेटमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा तसेच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. स्वामी प्रसाद यांच्या कन्या संघमित्रा या भाजपच्या खासदार आहेत.
राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पाठविलेल्या राजीनामापत्रात स्वामीप्रसाद यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी स्वतःची जबाबदारी पार पाडली, परंतु पक्षाने उपेक्षा केल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर बांदा जिल्हय़ातील तिंदवारी मतदारसंघाचे भाजप आमदार बृजेश प्रजापति यांनीही राजीनामा दिला आहे. स्वामीप्रसाद हे शोषित-पीडितांचा आवाज तसेच आमचे नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकरी, दलित, युवकांना दिली जात असलेली वागणूक सहन करता येत नाही. मंत्रिमंडळासह अन्य व्यासपीठांवरही आवाज उठविला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशा स्थितीत सन्मानाशिवाय भाजपमध्ये राहू शकत नव्हतो. राजीनाम्यापूर्वी सुनील बन्सल आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती असे स्वामी प्रसाद यांनी सांगितले आहे.
अनेक जण देतील राजीनामा
पुढील काळात 10-12 आणखीन आमदार राजीनामा देतील. एक ते दोन दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांसमोर पूर्ण स्थिती मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कानपूर ग्रामीणचे भाजप आमदार भगवती प्रसाद सागर देखील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. जवळपास 11 आमदारांसह समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा स्वामीप्रसाद यांच्याकडून केला जातोय.
अखिलेश यांचा ट्विट
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबतचे छायाचित्र ट्विट करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षात प्रवेश करणाऱया सर्व नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.
विचारसरणीमुळे नाराजी
ज्या पक्षात मी असेन, त्याच पक्षाचे सरकार सत्तेवर येणार आहे. भाजपमधील कुठल्याही नेत्याबद्दल नाराजी नाही, तर माझी नाराजी विचारसरणीबाबत आहे. भाजपची विचारसरणी गरीब, दलित, शेतकरी आणि तरुणाईच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.