वार्ताहर / रामदुर्ग
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असून नियमितपणे रक्तदान केल्यास शरीरात पुन्हा नवीन रक्ताची उत्पत्ती होते व आरोग्य स्थिर राहते. रक्तदान केल्यास एकाचा जीव वाचविल्याचे पुण्य मिळते, असे मत डिव्हाईन पार्क सी-2 चे अधिकारी रमेश बिसरळ्ळी यांनी व्यक्त केले. येथील शासकीय रुग्णालयात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते.
यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉ. नवीन निजगुली म्हणाले, रक्ताला पर्यायी वस्तू नाही. आता विज्ञान कितीही पुढे गेले तरी रक्ताला दुसरा पर्याय शोधता आलेला नाही. रक्तदान केल्यास समस्या उद्भवतात, अशी अनेकांमध्ये अंधश्रद्धा आहे. मात्र, रक्तदान केल्याने कोणतीही समस्या उद्भवत नसून आरोग्याची वृद्धी होते, आरोग्याबाबत कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. त्यामुळे युवकांनी रक्तदान करण्यास पुढे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. रक्तदान शिबिरात 64 युवकांनी सहभाग घेतला होता.
शिबिराप्रसंगी स्वामी विवेकानंद गळेयर संघाचे अक्षय हल्याळ, विनायक दोडमनी, इरण्णा मान्वी, मल्लू बडिगेर, विवेक महिला संघाच्या अध्यक्षा सावित्री हुरकडली, राजेश बिळगी आदी मान्यवरांसह शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.