गिरीश मांद्रेकर / म्हापसा
म्हादईबाबत सर्वजण खूप काही बोलत आहेत मात्र म्हादई पूर्वीच आमच्या हातातून गेली आहे. असे सांगून माजी जलस्त्रोत मंत्री श्री दयानंद मांद्रेकर म्हणाले की, आपण 5 वर्षे मंत्री होतो. म्हादईसाठी आम्ही खूप भांडलो आहोत. आम्ही पाणी वळविण्यास कदापी देणार नाही. असे अनेकदा सांगितले असले तरी जो कायद्याचा फार्स आहे तो कुणालाही वळविण्याचा अधिकार नाही तो सर्वोच्च न्यायालयालाही नाही. जे काही कर्नाटकने केले आहे ते दादागिरीने केले आहे. त्यांचे म्हादईचे बजेट 400 कोटी आणि आमच्या जलस्त्रोत खात्याचे बजेट सोडेतीन कोटी आहे. यात कसे होणार. मी मुख्यमंत्र्यांना सहा महीन्यापूर्वी सांगितले आहे म्हादईचा विषय सोडून द्या. म्हादई आम्हाला कधीच मिळणार नाही, म्हादई आमच्या हातातून गेली आहे. तिळारीसाठी इतके कोटी खर्च केले मात्र तेसे येथे व्हायला नको. त्यापेक्षा साळ सारखे बंधार घेतले आहे तसे बंधारे बांधणे अत्यावश्यक आहे. आमच्या नदीचे पाणी साठवा दर वर्षी अंदाजे दिडशे इंच पाऊस पडतो तर सव्वाशे इंच व्हावून जातो. राज्यात हणजूण व विर्डी येथे धरणे बांधण्याचा प्रस्ताव आपण मंत्री होण्यापूर्वी सरकारने केला आहे. मात्र तो प्रस्ताव अद्याप पडून आहे. पैसे कोर्ट कचेरीसाठी घालण्यापेक्षा याच पैशांचा वापर पाणी अडवून ठेवणाऱया धरणे बांधणीसाठी करावा. जेणेकरून आम्हाला 15 लाख नागरिक व 15 लाख पर्यटकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होईल अशी माहिती माजी जलसिंचन पुरवठा मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दै. ‘तरुण भारत’ला बोलताना दिली.
पुढे बोलताना माजी मंत्री मांद्रेकर म्हणाले की, गेल्या 10 वर्षात मे महिन्यात जे काही होत होते तीच पाण्याची समस्या आजही उद्भवत आहे. ओपा धरणाची पातळी एप्रिल, मे मध्ये उतरते. यासाठी आम्ही सर्वेक्षण केले आहे. खाणपीठाचे पाणी काढून ओपाची पातळी भरली जाते. म्हादईच्या पाण्याच्या प्रश्नाची समस्या होण्यापूर्वीच पाच वर्षे अगोदर आम्ही सर्वेक्षण केले होते. त्यात अआम्हाला आढळऊन आले की, ओपाची पातळी दरवर्षी उतरते. बार्देश तालुक्याला जे पाणी येते ते साळहून अस्नोडा प्रकल्पाला येते. आणि अस्नोडाचे पाणी सातही बार्देश तालुक्याला येते. याचा अर्थ साळ आजही भरलेले आहे. जेणेकरून यातून असे दिसून आले आहे की, म्हादई व बार्देशच्या पाण्याचा काहीच संबंध नाही. असे ते म्हणाले.
ओपा ते साळावली 2 लाख एमएलडी क्षमता वाढविली
सत्तरीसाठी हणजूण, बार्देशसाठी साळचे, पेडणेसाठी तिळारी पाणी येते. सर्व सालसेत तालुका साळावलीचे पाणी देते. काणकोण, केपेसाठी चापोळी धरणाचे पाणी देते. यात दोन तालुक्यांचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे. फोंडा आणि तिसवाडी या तालुक्यात ओपा धरणाचे पाणी येते. आणि खांडेपार नदीचे पाणी ओपा धरणात पोचते. याचा इफेक्ट या दोन तालुक्यांना येऊ शकतो. 2002 साली ओपाची पातळी कमी झाली त्यावेळी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी महिन्याच्या आत ओपा ते साळावली नवीन लाईन घातली. 2 लाख एमएलडी वाढविण्याची क्षमताही दिली असे मांद्रेकर म्हणाले.
पैशांचा वापर धरणे बांधण्यासाठी करा
पुढे बोलताना ते म्हणाले की, म्हादई पाणी बार्देशात येते की नाही याची माहिती नागरिकांना नाही आहे. आजच्या मंत्र्यांना जे काही नागरिकांना सांगायला पाहिजे ते सांगता येत नाही कारण त्यांनाच याविषयी माहीत नाही. म्हादईचा विषय आम्हाला एकाच धरणाला लागतो आणि दोनच तालुक्यांना मिळतो हे मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. जलसिंचन खात्याला केंद्राकडून लाखो रुपये येतात. या पैशांचा वापर करून सर्वप्रथम 2 धरणे गरजेचे आहे. जेणेकरून आम्ही हणजूणेवर आणि एक धरण बांधू शकतो. अमेरीका सारख्या देशात पाण्यापासून वीज तयार करतात. पाण्यासाठी वीज खर्च करीत नाही. धरणापासून वीज तयार होते हे सर्वांना माहीत आहे. आम्ही पाण्यासाठी पंप तयार करू लागले तर कसे होणार. असा प्रतिसवाल मांद्रेकर यांनी केला.
अस्नोडाचे पाणी फक्त पिण्यासाठीच द्या
आमच्याकडे साळावलीत पाणी खूप आहे मात्र गोव्यातील नागरिक उलटे आहेत. सरकार अस्नोडा प्रकल्पात पाणी ट्रिट करण्यासाठी एवढे पैसे खर्च करतात. व पाणी प्यायला देतात. मात्र आम्ही ते पाणी पिण्यासाठी न वापरता झाडांसाठी वापरतो. आणि आम्ही बिसलेरी पाणी पितो. कुणाला माहीत आहे बिसलेरी पाणी बरे आहे की नाही. तिळारीचे पाणी अन्य कामासाठी द्या व अस्नोडाचे पाणी फक्त पिण्यासाठीच द्या. जनतेला 2 कनेक्शने घेऊ द्या असे त्यांनी सांगितले.
पाऊस जास्त पडल्याने तिळारीचे पाणी पाच वेळा सोडले. त्याचा त्रास शेवटी आम्हालाच होतो ते पाणी शापोरा नदीत येते आणि कामुर्ली, कोलवाळ, मोरजी गाव बुडतात. पाणी अडविणार तर खूप गोष्टी करण्यासाठी वाव आहे. तिळारी धरणास भय नाही. आम्हाला पाणी विकत घेण्याचीही गरज नाही. राज्यात अन्य बंधारे घालणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांच्या कल्पनेतून बंधारे घालण्याचे झाले होते त्या कल्पनेचे नियोजन चांगले झाले तर म्हादई ही आमच्यापुढे मोठी समस्या नाही अशी माहिती माजी जलस्त्रोत मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दै. तरुण भारतला दिली.