दिमाखात उभे राहणार स्मारक सभागृह : जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी / सातारा
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ सातारा येथे स्मारक सभागृह उभारण्यासाठी 8कोटी 27लाख एवढा निधी शासनाने मंजूर केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद आबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठपुरावा सुरू होता.त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी भरघोस निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.उदय कबुले म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार पाठपुरावा केला. त्याला यश येऊन 8 कोटी 27 लाख इतका निधी स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृहासाठी मंजूर झाला आहे. एका स्वतंत्र आदेशान्वये हा निधी वितरित करण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे कळविले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सातत्याने चर्चा करून आणि पाठपुरावा करून अखेर ग्रामविकास विभागाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे शासनाचे विविध स्तरातून आभार मानले जात आहेत. या स्मारक सभागृहाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाशेजारी हे स्मारक सभागृह आकर्षक पद्धतीने उभे राहणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सातारा नगरीमध्ये हे स्मारक सभागृह उभे राहत आहे ,याचा विशेष आनंद आणि अभिमान आहे, असे देखील कबुले यांनी सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक सभागृह उभे राहणार आहे. त्यासाठी संपूर्ण संबंधित यंत्रणा काटेकोर नियोजन करीत आहे . संग्रहालय, कलादालन, प्रदर्शन दालन, वाचनालय, मिटींग हॉल, विश्रामग्रह यासोबतच परिसर सुशोभीकरण, विद्युतीकरण, वातानुकूलित यंत्रणा असे सर्वांगपूर्ण ,सुसज्ज असे हे स्मारक असणार आहे. हे स्मारक वेळेत आणि सर्वांगपूर्ण व्हावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्मारक समिती गठीत करण्यात आली आहे.
स्मारकाचा आराखडा तयार असून त्यामध्ये तळमजल्यावर वाहनतळ, पहिल्या मजल्यावर प्रदर्शन दालन आणि मिटिंग हॉल तसेच बैठक दालन तर दुस्रया मजल्यावर विश्रामग्रह आणि वाचनालय उभे राहणार आहे. त्यासोबतच अंतर्गत रस्ते ,परिसर सुशोभीकरण संरक्षक भिंत व इतर अनुषंगिक बाबी देखील प्रस्तावित आहेत. नामवंत वास्तुशास्त्रज्ञ रवींद्र कदम यांनी स्मारकाचा सर्वसमावेशक उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे, अशीदेखील माहिती या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. हे स्मारक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचाचे कायमचे निदर्शक ठरेल. लोकाभिमुख नेतृत्व, उत्कृष्ट वक्ता ,प्रभावी साहित्यिक असे स्व. यशवंतराव चव्हाण यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. या भव्य आणि सर्वांगपूर्ण स्मारक सभागृहाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींचे निरंतर जतन केले जाईल आणि हे स्मारक सातायाची शोभा वाढवेल, असेही त्यांनी सांगितले.