फिरोज मुलाणी/ औंध
गुरू बद्दल श्रद्धा आणि निष्ठा असणारे या जगात दुर्मिळ लोक सापडतील त्यामध्ये जागतिक पदक विजेता मल्ल राहुल आवारे याचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. यशाच्या शिखरावर पोहचूनही राहुलने आपल्या गुरुवरील निष्ठा अजिबात ढळू दिलेले नाही. उलट गुरुच्या स्मृती जपण्यासाठी त्याने राज्यातील होतकरू मल्लांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी रुस्तुम ए हिंद स्व हरिश्चंद्र बिराजदार मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेची वर्षपूर्ती झाली असून यापुढेही योजना सुरू ठेवण्याचा निर्धार राहुल आवारे याने केला आहे.
स्व हरिश्चंद्र बिराजदार यांनीच महाराष्ट्राला डोईजड होऊ पाहणाया महाबली सत्पालला पराभवाची धूळ चारली होती. आणि तेच बिराजदार मामा राहुलचे गुरु होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या राहुल सारख्या प्रतिभावंत हियाला पैलू पाडण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या दैदिप्यमान कामगिरीने यशाची शिडी चढत शिखरावर आरुढ होऊनही त्याचे पाय जमीनीवर राहिले आहेत. यशाची हवा त्याच्या डोक्यात कधीच शिरली नाही आणि गुरुवरील निष्ठाही कधी ढळली नाही. मधल्या काळात बिराजदार मामांच्या अकाली निधनामुळे राहुलला मोठा धक्का बसला होता.
त्यातून सावरुन आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जुनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव पुढे चालू ठेवला. आणि पुन्हा नव्या दमाने राष्ट्रकुल, एशियन चँम्पियनशिप आणि अगदी जागतिक कुस्ती स्पर्धेत देखील त्याने पदक मिळवले होते. तरी देखील त्याला कधीच गुरु स्व बिराजदार मामांचे विस्मरण झाले नाही. नेहमीच मिळालेले पदक मामांच्या तस्बिरीपुढे ठेवून एकप्रकारे त्यांना पदकाने आदरांजली वाहिली होती. सदैव गुरुचे स्मरण करणाया राहुलने मामांच्या स्मृती कायम स्वरुपी जपण्यासाठी राज्यातील होतकरू उभरत्या मल्लासाठी अभिनव योजना आखली.
होतकरू प्रतिभावंत मल्लांच्या खुराकासाठी आर्थिक मदतीची जबाबदारी स्वीकारली. रुस्तुम ए हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून पैलवान मानधन योजना डि वाय एसपी राहुल आवारे याने सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि गुणवत्ताधारक पाच मल्लांची निवड करण्यात आली. त्यांना महिन्याला खुराक आणि स्पर्धेसाठी येण्याजाण्याच्या खर्चासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन सुरू केले. पाचजणांना वर्षात मिळून तीन लाख रुपये मानधन स्वतः राहुलने दिले आहे. पहिल्या टप्प्यात रामा कांबळे, जोतिबा आटकळे, पाटील,निखिल कदम
सौरभ पाटील यांचा समावेश आहे.
आर्थिक परिस्थितीशी दोन हात करून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाया या नवोदित होतकरू मल्लांना स्व हरिश्चंद्र बिराजदार मानधन योजनेमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.ज्या गुरुमुळे आपल्याला कुस्ती क्षेत्रात यशाचा टप्पा गाठता आला त्यांच्या स्मृती चिरंतर जपण्यासाठी राहुल आवारेने सुरू केलेल्या पैलवान मानधन योजनेचे कौतुक कुस्तीक्षेत्रातून होत आहे.या योजनेमुळे मल्लांना आर्थिक आधार मिळत असल्याने मनाला समाधान मिळते. त्यामुळे यापुढे देखील ही मानधन योजना सुरू ठेवून मामांच्या स्वप्नातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार राहुलने केला आहे.