आधुनिक काळातील युद्धांमध्ये नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार दिसून आला आहे. रशियाकडून युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्यात आले असून हे हल्ले प्रामुख्याने शहरांवर झाले आहेत. युक्रेनकडे स्वतःची क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा नसल्याने त्याला युरोप तसेच अमेरिकेकडे मदत मागावी लागली आहे. भारताकडेही दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा नव्हती, परंतु भारतीय वैज्ञानिकांनी आता स्वदेशी क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा विकसित केल्याने भारताच्या सुरक्षेला बळकटी प्राप्त झाली आहे.
भारताने शत्रूच्या हल्लेखोर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचावाची स्वदेशी क्षमता प्राप्त केल्याची घोषणा काही काळापूर्वी केली आहे. एडी-1 नावाच्या या स्वदेशी इंटरसेप्टर क्षेपणास्त्र म्हणजेच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेचे ओडिशाच्या अब्दुल कलाम परीक्षण केंद्रावरून यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. या यंत्रणेमुळे भारताला आता विदेशी प्रणालींवर निर्भर रहावे लागणार नाही. दोन दशकांच्या प्रयत्नानंतर मिळालेल्या या यशामुळे भारत आता अमेरिका (पॅट्रियट आणि थाड प्रणाली), रशिया (एस-400), इस्रायल (एरो-3) यासारख्या निवडक देशांच्या शेणीत सामील झाला आहे. भविष्यात भारत या यंत्रणेची मित्रदेशांना निर्यात करून विदेशी चलन मिळवू शकतो. भारताने मागील काही वर्षांमध्ये संरक्षण सामग्रीचा आयातदार ही भूमिका त्यागण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यानुसार भारताने आता संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांना सहभागी केले आहे. याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. भारताने चालू वर्षात आता 7 हजार कोटीपेक्षा अधिक मूल्याची संरक्षण सामग्री निर्यात केली आहे.
अत्यंत मोठे यश
एडी-1 सोबत देशाने ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. 5 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करणारे अग्निसारखे क्षेपणास्त्र भारताकडे होते, परंतु कुठलीच क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा नव्हती. याचमुळे भारताला रशियाकडून एस-400 नावाच्या 5 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी करण्यासाठी सुमारे 5 अब्ज डॉलर्सचा खर्च करावा लागला आहे. भारताचा शेजारी देश असलेला चीन हा मोठी क्षेपणास्त्रशक्ती बाळगून आहे. चीनने पाकिस्तानलाही आधुनिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला आहे. हे पाहता भारताने रशियाकडून आयात एस-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. चीन देखील एस-400 च्या मदतीने स्वतःच्या राजधानीचे रक्षण करत आहे. चीनने आता ही यंत्रणा लडाखला लागून असलेल्या सीमेवरही तैनात केली आहे. एडी-1 यंत्रणेच्या मदतीने भारत आता चीनचे आव्हान परतवून लावण्यास अधिकच सक्षम ठरला आहे.
2000 साली प्रकल्पास प्रारंभ
भारताने स्वदेशी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा प्राप्त करण्याचा निर्णय कारगिल युद्धानंतर 2000 साली घेतला होता. तेव्हा पाकिस्तानकडून वारंवार क्षेपणास्त्रs डागण्याची धमकी देण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) हैदराबाद येथील प्रयोगशाळा डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरीने (डीआरएल) क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीच्या विकासावर काम सुरू केले होते. सुमारे दीड दशकाच्या आता क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचे विकासकार्य पूर्ण करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील दोन स्तरीय (टू टियर) क्षेपणास्त्र शत्रूच्या हल्लेखोर क्षेपणास्त्राला किमान 15-25 किलोमीटर आणि कमाल 80-100 किलोमीटर अंतरापर्यंत नष्ट करू शकते. पहिल्या टप्प्यातील दोन स्तरीय क्षेपणास्त्र 5 हजार किलोमीटरपेक्षा अधिक मारक पल्ला असणाऱया क्षेपणास्त्रांना आकाशात नष्ट करू शकत नव्हते. याचमुळे दुसऱया टप्प्यात ऍडव्हान्स्ड (अत्याधुनिक) प्रणालींचा विकास करण्यात आला आणि याला एडी-1 नाव देण्यात आले. क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा विकसित करणे अत्यंत अवघड असल्याचे मानले जाते. याचमुळे डीआरडीओने स्वदेशी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करत देशाची मोठी संरक्षणात्मक गरज पूर्ण केली आहे. पुढील काही काळात ही क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा संरक्षण दलांच्या ताफ्यात सामील होणार आहे. याचबरोबर ही यंत्रणा सीमेवर तैनात करण्यासह महानगरांच्या सुरक्षेकरता वापरली जाऊ शकते.
कशी काम करते ही यंत्रणा?
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ध्वनिपेक्षा दोन-तीनपट अधिक वेगाने हल्ला करते, हे क्षेपणास्त्र शत्रूच्या भागात कोसळण्यास 5-10 मिनिटांचाच कालावधी लागत असतो. क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांचा मारक वेग याहून (ध्वनिपेक्षा 4-5 पट अधिक ) असतो, यामुळे हल्लेखोर क्षेपणास्त्राच्या तुलनेत अधिक वेगाने उड्डाण करत क्षेपणास्त्रविरोधी अस्त्र त्याला जाऊन धडकू शकते. शत्रूच्या भागातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs डागण्यात आल्यावर क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला स्वतःचे रडार किंवा उपग्रहांवरून इशारावजा माहिती मिळते. क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीचे रडार हल्ल्याची शक्यता पाहता स्वतःच्या युनिटला सतर्क करतात आणि त्याच क्षणी इंटरसेप्टर क्षेपणास्त्र शत्रूच्या हल्लेखोर क्षेपणास्त्राला पाडण्यासाठी स्वतः सक्रीय होतात. अशाप्रकारच्या क्षेपणास्त्र प्रणालींना उपग्रहांद्वारेही लक्ष्य शोधण्यास मदत मिळत असते. एडी-1 हे दीर्घ पल्ल्याचे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे. एडी-1 हे शत्रूच्या दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह लढाऊ विमानांनाही लो-एक्सोऍटमॉस्फेरिक आणि एंडो-ऍटमॉस्फेरिक म्हणजेच वायुमंडळाबाहेर आणि वायुमंडळताच नष्ट करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे.
चीन-पाकिस्तानकडून धोका
सद्यकाळात केवळ हल्ला करू शकणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्राप्त करणे संरक्षणासाठी पुरेसे मानले जाऊ शकत नाही. या क्षेपणास्त्रांना उड्डाणांदरम्यान आकाशातच नष्ट करण्याची क्षमता प्राप्त होत नाही तोवर कुठलाच देश खऱया अर्थाने क्षेपणास्त्रशक्ती म्हणवून घेऊ शकत नाही. भारताच्या क्षेपणास्त्रसामर्थ्यात हीच मोठी कमतरता जाणवत होती. अमेरिकेने थाड प्रणाली स्वतःच्या सीमांवर आणि वॉशिंग्टनसारख्या मोठय़ा शहरांच्या रक्षणासाठी तैनात केली आहे. दक्षिण कोरियातही अशाचप्रकारची क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली तैनात करण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या आगळिकीला तोंड देण्यासाठी दक्षिण कोरियाने हे पाऊल उचलले आहे. भारताची स्थिती याहून वेगळी नसल्याने क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा अत्यंत आवश्यक ठरली होती. भारताच्या शेजारी तिबेटमध्ये चीनकडून मोठय़ा संख्येत भारतातील मोठय़ा शहरांच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs तैनात करण्यात आली आहेत. पाकिस्ताननेही भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात घौरी आणि गजनवी यासारखी मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs चीनच्या मदतीने तैनात केली आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या या आगळीकीमुळे नवी दिल्लीसारख्या देशातील मोठय़ा अन् महत्त्वपूर्ण शहरांना मोठा धोका निर्माण झाला होता. याचमुळे देशातील मोठय़ा महानगरांचे आण्विक हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेची गरज व्यक्त होत होती.
निर्भरता संपणार
भारताने रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदीसाठी करार केल्यावर अमेरिकेने स्वतःच्या काट्सा कायद्याच्या अंतर्गत निर्बंध लादण्याची धमकी भारताला दिली होती. परंतु अमेरिकेने थाड किंवा पॅट्रियट यंत्रणा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव भारताला दिला होता. एडी-1 इंटरसेप्टर क्षेपणास्त्र विकसित झाल्यावर आता बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी भारताला आता कुणाच्याच दबावाला सामोरे जावे लागणार नाही. तसेच कुणावर अवलंबूनही रहावे लागणार नाही. कारगिल युद्धावेळी भारताला संरक्षणसामग्रीची गरज असताना अनेक देशांनी हात वर केले होते. केवळ इस्रायलचा अपवाद वगळता अन्य देशांनी युद्धावेळी तातडीने मदत केली नव्हती. याचाच धडा घेत भारताने संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एडी-1 ही यंत्रणा याचाच एक परिपाक आहे.
– संकलन – उमाकांत कुलकर्णी