गव्यांकडून पिकांचे नुकसान : बंदोबस्तासाठी प्रयत्न, अधिकाऱयांचे आश्वासन : शेतकऱयांना भरपाई मिळवून देण्याची ग्वाही
वार्ताहर / किणये
हंगरगे शिवारात गवीरेडय़ांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. या गवी रेडय़ांनी शिवारातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. गवीरेडय़ांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी हंगरगे गावातील शेतकऱयांनी वनखात्याला दिले होते. अखेर वनखात्याच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी दुपारी हंगरगे परिसरातील शिवाराची पाहणी केली.
हंगरगे गावातील बहुतांशी शेतकऱयांच्या शेतजमिनी या डोंगरपायथ्याशी आहेत. या शेतातील बटाटा, बिन्स, ज्वारी, मका, ऊस आदी भाजीपाला पिके गवीरेडय़ांनी फस्त केली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झालेला आहे. शुक्रवारी दुपारी वनखात्याचे रेंजर शिवानंद एस. मगदूम व त्यांच्या सहकाऱयांनी हंगरगे शिवारातील गवीरेडय़ांनी नुकसान केलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी हंगरगे गावातील शेतकरीही उपस्थित होते.
पीक उत्पादनासाठी आम्ही वारेमाप खर्च करून पीक घेतो. आम्हा ग्रामस्थांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शिवारात बहरून आलेल्या पिकांचे गवीरेडय़ांकडून नुकसान होत आहे. याचा आर्थिक फटका आम्हाला बसत आहे. तसेच या भागात 20 ते 25 गवीरेडय़ांचा कळप मुक्तपणे संचार करत आहे. दिवसाढवळय़ाही शिवारात गवीरेडे येऊ लागले आहेत. यामुळे आम्हा शेतकऱयांना शेतावर जाणे मुश्कील झाले आहे. आमच्या पिकाची नुकसानभरपाई मिळवून द्या, तसेच आम्हाला शेती करण्यासाठी या भागातून गवीरेडय़ांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा, असे ठणकावून शेतकऱयांनी आलेल्या
अधिकाऱयांना सांगितले.
रेंजर शिवानंद मगदूम यांनी पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱयांनी ज्या शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे, त्याचा फोटो, शेताचा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक व वैयक्तिक अर्ज अशी कागदपत्रे द्यावीत. ती आम्ही वनखात्यामार्फत पुढील कार्यवाहीसाठी पाठवून देऊ, असे सांगितले.
तसेच हंगरगे, कर्ले, किणये, बेळवट्टी, नावगे या भागात गवीरेडय़ांनी धुमाकूळ घातला आहे. दरवषी गवीरेडय़ांचा कळप या परिसरात येतो, अन् शेतातील पिकांचे नुकसान करतो. या गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अधिकाऱयांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे काही शेतकऱयांनी बोलून दाखविले. यावर मगदूम यांनी या भागातून गवीरेडय़ांना हुसकावून लावून जांबोटी डोंगर भागात जातील, अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. तालुका पंचायत माजी सदस्य कृष्णा हुंदरे, जिल्हा पंचायत माजी सदस्य दिलीप कांबळे, मोनाप्पा चलवेटकर, गावडू पाटील, कृष्णा पाटील, नारायण यादो पाटील, मारुती पाटील, यल्लाप्पा पाटील, भरमा पाटील, कल्लाप्पा पाटील, आनंदा वैजू पाटील, भरमा सावंत आदी शेतकरी उपस्थित होते.