मानवालाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला जसा उजेड महत्त्वाचा आहे तसाच अंधारही महत्त्वाचा आहे. रात्रीच्या अंधारात उद्याची स्वप्ने पहायची आणि दिवसाच्या उजेडात सत्यात उतरवण्यासाठी धावायचे. धावून धावून थकल्या-भागल्यानंतर अंधारात साऱया कष्टाला, मान-अपमानाच्या क्षणांना आठवत, मनाचे समाधान करून पुन्हा झोपेच्या स्वाधीन व्हायचे. हे युगानुयुगे माणसाचे जीवनचक्र सुरू आहे. पण आता या अंधाराचे अस्तित्व कृत्रिम प्रकाशाने धोक्मयात आणले आहे. जगभर त्याची चिंता व्यक्त होत असून अंधार कमी होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. अंधाराच्या भीतीचे सावट कुठल्याही युगात नष्ट झाले नव्हते. अन्न शिजवण्यासाठी मानवाने जसा अग्नी उपयोगात आणला तसाच अंधारातल्या भीतीवर मात करण्यासाठीही त्याने अग्नीचा वापर केला. याच अग्नीच्या जोरावर त्याची चराचरावर जरब बसली. पण तरीही रात्रीच्या अंधाराला पूर्णतः आव्हान निर्माण झाले नव्हते. विजेच्या दिव्याचा शोध लागल्यानंतर अंधाराला आव्हान उभे राहिले. वाढत्या नागरीकरणाने आता तर या अंधाराला नष्ट केले जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अंधारामुळे माणसाच्या मनात भय निर्माण झाले असावे. पण या भयातून मुक्तीसाठीचा मार्ग म्हणून रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिवे लावून ते प्रकाशमान करण्याचा प्रयोग जगभर गत शतकात पार पडला. रात्रीच्या काळोखात उजळणारे आणि घरोघरच्या श्रीमंतीचे दर्शन घडविणारे ते दिवे लोकांच्या डोळय़ाचे पारणे फेडायला लागले. शतकांनंतरसुद्धा विद्युत रोषणाई करण्याची आणि ते पहायला जाण्याची हौस जराही कुठे कमी झालेली नाही. उलट या विद्युत रोषणाईत नवनव्या प्रयोगांची भर दिवसागणिक पडत असते. भारतात जिथे नागरीकरण वाढले त्या सर्व राज्यांमध्ये वेगवेगळय़ा पद्धतीचे आकर्षक पथदिवे उभारले जाऊ लागले. महानगरांमधील रोषणाई तर रात्र आहे की दिवस असा प्रश्न पडावा अशी. मग त्याचेच अनुकरण मध्यम शहरे, छोटी शहरे आणि गावापर्यंत पोहोचत जाते. कधी काळी रात्रीची सुरक्षितता म्हणून आणि रात्री प्रवास करणाऱयांना मार्ग दिसावा म्हणून शहरातून केलेली ही कलात्मक पथदिव्यांची सोय प्रारंभीच्या काळात समाजाच्या मनात घर करून गेली. हळूहळू हे पथदिवे आणि रोषणाईचे प्रकार इतके वाढले, की आज त्याच्याकडे जगाला गांभीर्याने पहायची वेळ आली आहे. या कृत्रिम प्रकाशाचा परिणाम जीवसृष्टीवर फारच विपरीत होत असल्याचे मत शिकागो आणि इंग्लंडमधील अभ्यासकांनी मांडले आहे. यामुळे निसर्गचक्र बिघडले, प्रत्येक जीवावर त्याचा परिणाम होत आहे. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण आतापर्यंत मोजले जात होते. आता जगभर प्रकाश प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. मानवनिर्मित प्रकाशाचा परिणाम मानवावर, वनस्पतीवर आणि इतर जिवांवरही होऊ लागला आहे. सर्वच प्रकारच्या ऊर्जेचा अनिर्बंध वापर करणाऱयांच्या देशातील हा अभ्यास आहे असे म्हणून आपणास यातूनच सुटता येणार नाही. कारण पुण्यातील सामाजिक अभ्यासक विनय र. र. यांनी भारतात सुद्धा प्रकाश प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याचे आणि बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र हे चक्रच मोडून पडल्याचे म्हटले आहे. भारतात विशेषतः औद्योगिक प्रगत राज्यांमध्ये आणि नागरीकरणाचे प्रमाण अधिक आहे तिथे प्रकाश प्रदूषण वाढत आहे. दिव्यांच्या जवळ असलेल्या झाडांची पाने लवकर गळत नाहीत. त्यामुळे पुढील पाने उशिरा येतात. तोपर्यंत पाऊस सुरू होतो आणि ती पाने खुरटली जातात. कृत्रिम प्रकाशाचा निशाचरांवर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे वटवाघळांची संख्या घटत आहे. तर डास खाण्यास वटवाघळे उपलब्ध नसल्याने डासांची संख्या वाढत आहे. तसेच घुबडाचे भक्ष्य उंदीर आहे. पण ते प्रकाशापासून दूर राहू लागल्याने शेतीत उंदरांचा उपद्रव वाढू लागला आहे. समुद्र किनारी उजेड पाहून पाणकासवे चुकीच्या ठिकाणी अंडी घालायला बाहेर येऊन बळी पडत आहेत. या सर्वांहून मोठा परिणाम हा मानवावर सुरू आहे. कॉम्प्युटर मोबाईलमुळे त्याच्या डोळय़ावर परिणाम होतोच पण आता सतत जळणाऱया दिव्यांचा जाग आणि झोप यांचे संतुलन साधणाऱया आणि झोपेतच दुरुस्त करणाऱया मैलाटोनीन या नैसर्गिक संप्रेरकाच्या निर्मितीवर परिणाम होऊ लागला आहे. सततच्या प्रकाशाने ही संप्रेरके निर्माण होण्यात अडथळा होत आहे. त्यामुळे निद्रानाश, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर यासारख्या व्याधी होऊ शकतात. अंधार नाहीसा होऊ लागला तर मानवी जीवन आणि जीवसृष्टी यांचे संतुलन किती ढळणार याचा विचारही करवत नाही. आधीच हवा, पाणी आणि जल प्रदूषणाने मानवी जीवन प्रभावी झाले असताना या नव्या आव्हानाने त्याची झोपच उडणार आहे. अंधार हा प्रत्येकाला गरजेचा आहे. त्याचे महत्त्व प्रत्येकालाच असते. मात्र रात्रीच्या प्रकाशाने असे काही विपरीत परिणाम होत असतील याचा कोणी विचारही केला नसेल. आता तो करायची वेळ येणार आहे. चोरी वगैरे भयाने लावलेल्या दिव्यांच्या उजेडातही सुरूच आहेत. आता तर त्या दिव्यांचा झगमगाट म्हणून अधिक वापर होत आहे. हा झगमगाट प्रयत्नपूर्वक कमी करायचा तर लोकांना खूप पटवून सांगावे लागणार आहे. आता कुठे यावर विचाराचा प्रारंभ झाला आहे. पण हक्काचा अंधार हवा असेल तर त्याचे अस्तित्व राखण्याची कृतीही करावीच लागेल.
Previous Articleवीजबिले माफ करणारी योजना जाहीर करावी
Next Article आयपीएल रुपरेषेची आज घोषणा : गांगुली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.