सभेपुढे विषय न घेताच होतायत कामे, विरोधी आठ सदस्यांचा आरोप
वार्ताहर /कराड
हजारमाची ग्रामपंचायतीतील सत्ताधारी विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता व सभेपुढे विषय न घेताच मनमानी पद्धतीने कामे करीत आहेत. तसेच सभा सुरू असताना प्रोसेडींग लिहण्याचे गटविकास अधिकाऱयांचे आदेश असतानाही ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याने बुधवारी विरोधी सदस्यांनी सभात्याग केला असुन याबाबत गटविकास अधिकाऱयांकडे तक्रार केली असल्याची माहिती सदस्य शरद कदम यांनी दिली.
हजारमाची ग्रामपंचायतीतील सत्ताधाऱयांच्या एकाधिकारीशाहीची माहिती देण्यासाठी विरोधी सदस्यांनी पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. यावेळी सदस्य शरद कदम, पितांबर गुरव, विनोद डुबल, संगीता डुबल, सारिका लिमकर, ऐश्वर्या वाघमारे, जयश्री पवार, ऍड. चंद्रकांत कदम, ऍड. दादासाहेब जाधव, नंदकुमार डुबल, बबनराव पवार, कुमार इंगळे, बाबासाहेब पावार, जयवंत वीरकायदे, सतीश पवार, राजू काटवटे आदींची उपस्थिती होती.
शरद कदम म्हणाले, ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणाऱया कामांची नियमाप्रमाणे सभेत चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र असे न होता सभेत केवळ पाच ते सहा विषय होतात. सभेनंतर सत्ताधारी हवे ते ठराव प्रोसेडींगमध्ये घुसडतात. तसेच तीन लाखाच्या पुढच्या कामांचे टेंडर काढणे गरजेचे असतानाही नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे विरोधी सदस्यांनी गटविकास अधिकाऱयांकडे सभा सुरू असताना प्रोसेडिंग लिहीण्याची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱयांनी ग्रामसेवकांना तसे लेखी आदेश दिले होते. मात्र बुधवारी झालेल्या सभेत त्याचवेळी प्रोसेडींग लिहीण्यास ग्रामसेवकांनी असमर्थता दर्शवल्याने उपस्थित असलेल्या 7 विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर केवळ सहा सत्ताधारी सदस्य असताना व कोरम पूर्ण नसतानाही सभा घेण्यात आली. याबाबत गटविकास अधिकाऱयांकडे तक्रार केल्याचे शरद कदम म्ह्णाले.
संगीता डुबल म्हणाल्या की, ग्रामपंचायतीत सरपंचाचे दीर, उपसरपंच व ग्रामसेवकच मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. विरोधी दुरच सत्ताधारी सत्ताधारी सदस्यांनाही अनेक गोष्टींची कल्पना नसते. सत्ताधाऱयांकडून विरोधी सदस्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचेही त्या म्हणाल्या.
ग्रामपंचायतीच्या कर वसुलीचे नियोजन नसल्याने सत्ताधारी सर्व कामे 15 व्या वित्त आयोगातून करण्यात येत आहेत. सध्या पाणी पुरवठा योजनेचे सुमारे 80 लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. आराखाडयाबाहेरील कामांना परवानगी नसतानाही 15 व्या वित्त आयोगाचे पैसे खर्च करण्यात येत आहेत. पाणी योजनेचे वीजबिलही 15 व्या वित्त आयोगातुन भरण्यात आल्याचे शरद कदम म्हणाले.
न केलेल्या कामांचेही श्रेय…
गेल्या पंचवार्षिकमध्ये मंजूर झालेल्या कामांचे नारळही सत्ताधारी फोडत असल्याचा आरोप माजी सरपंच सतीश पवार यांनी केला. इंदिरानगर व राजाराम नगर येथील काँक्रीट रस्ता व गटर गेल्या पंचवार्षिकमध्ये मंजूर झाले असताना गुरूवारी सत्ताधाऱयांनी या कामाचे नारळ फोडण्याचा घाट घातला आहे. मात्र या कामांची वर्कऑर्डर मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या हस्ते शुभारंभ करणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले.