पंतप्रधान मोदींचे उद्गार : द्विपक्षीय संबंधांना विशेष प्राथमिकता, मच्छिमारांचा मुद्दा उपस्थित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी ऑनलाईन बैठक झाली आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदींनी राजपक्षे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-श्रीलंका यांचे संबंध हजारो वर्षांपासूनचे आहेत. भारत सरकार ‘शेजारी प्रथम’चे धोरण आणि सागर सिद्धांताच्या अंतर्गत दोन्ही देशांच्या संबंधांना विशेष प्राथमिकता देत असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. कोविड-19 महामारीदरम्यान भारताने अन्य देशांसोबत मिळून केलेले काम कौतुकास्पद असल्याचे उद्गार राजपक्षे यांनी काढले आहेत.
दोन्ही नेत्यांच्या या ऑनलाईन परिषदेत मच्छिमारांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. स्थानिक मासेमारांच्या संघटनांसोबत मोदींनी शुक्रवारी चर्चा केली होती. हे ऑनलाईन शिखर संमेलन मोदींच्या पुढाकारानुसार आयोजित करण्यात आले आहे.
कोविड-19 च्या प्रकोपापासून भारतीय अधिकारी आता मच्छिमारांना स्वतःच्या सीमेपर्यंत रोखत नाहीत. या कारणामुळे स्थानिक मच्छिमार समुदायासाठी अडचण वाढल्या आहेत, असे विधान राजपक्षे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या सीमेदरम्यान होणारी मासेमारी आता एक मोठी समस्या ठरली आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांदरम्यान यासंबंधी उच्चस्तरीय चर्चा झाली होती.
दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय राजकीय आर्थिक, वित्त, विकास, संरक्षण, शैक्षणिक, पर्यटन आणि सांस्कृतिक मुद्दय़ांवर लक्ष केंद्रीत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर राजपक्षे यांची ही पहिलीच परिषदस्तरीय चर्चा होती.
मुक्त संचाराला पाठबळ
हिंदी महासागरात चीनचे बळ वाढविण्याच्या कृत्यादरम्यान श्रीलंकेन या सागरी क्षेत्राला कुणाच्या शक्तीचे प्रदर्शन करण्याचे केंद्र ठरू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिंदी महासागरात शांतता कायम राखण्यास प्राधान्य असल्याचे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित करताना म्हटले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात श्रीलंका सामरिक महत्त्वाच्या ठिकाणी आहे. भारताला घेरण्यासाठी चीन श्रीलंकेच्या या महत्त्वाचा वापर करू पाहत आहे.
निष्पक्षतेची ग्वाही
श्रीलंका आगामी काळात स्वतःचे निष्पक्ष विदेश धोरण कायम ठेवणार आहे. स्वतःच्या निष्पक्षतेवर प्रभाव पडेल, असा कुठल्याही देश किंवा समुहाशी जवळीक साधणार नाही. हिंदी महासागर क्षेत्राला शांत, निष्पक्ष आणि मुक्त संचाराचे क्षेत्र म्हणून कायम ठेवण्यासाठी सहकार्य द्या. शक्तिशाली देशांनी या सागरी क्षेत्राच्या नैसर्गिक संपदेला कुठल्याही प्रकारचे नुकसान पोहोचवू नये असे राजपक्षे यांनी म्हटले आहे.