दहा किलोमीटर अंतराचा परिसर सतर्क भाग घोषित
प्रतिनिधी/ मसूर
हणबरवाडी (ता. कराड) येथे गेल्या तीन दिवसांत 12 देशी पाळीव कोंबडय़ा अज्ञात रोगाने मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेने मसूर परिसर हादरून गेला आहे. दरम्यान, या ठिकाणच्या सुमारे दहा किलोमीटर अंतराचा परिसर सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकाऱयांनी घोषित केला आहे. गावातील ‘होम टू होम’ पक्ष्यांचा सर्व्हे करण्यात आला असून ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मसूरचे पशुधन विकास अधिकारी डी. के. कोकरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी 14 जानेवारी सायंकाळी हणबरवाडी येथील धनगरवस्ती परिसरातील दोन कोंबडय़ा मृत्युमुखी पडल्या, तर दुसऱया दिवशी पहाटे व सकाळी आठ कोंबडय़ा मृत्युमुखी पडल्या. त्यामध्ये रमेश कोळेकर 5, बाळकृष्ण कोळेकर 2, सतीश कोळेकर 1 मधुकर पोळ 2 अशा एकुण दहा कोंबडय़ा मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर शनिवार 16 रोजी आणखी दोन कोंबडय़ा अज्ञात रोगाने मृत्युमुखी पडल्या.
सध्या देशात बर्ड फ्लूचे संकट काही ठिकाणी ओढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. टी. परिहार, कराडचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. बोर्डे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. उंडेगावकर आदींनी भेट दिली. मृत कोंबडय़ांची पाहणी करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच मृत कोंबडय़ा जमिनीत पुरून त्याची विल्हेवाट लावली असल्याचे त्यांनी सांगितले.
खबरदारी घेण्याचे आवाहन…
हणबरवाडी येथे होम टू होम पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. गावात सुमारे साडेबाराशे पक्षी आढळून आले आहेत. कोंबडय़ांच्या खुराडय़ांची स्वच्छता पाळण्याचे आवाहन करत नागरिकांनी घाबरून न जाता याबाबत कोणतीही अडचण आल्यास पशुधन विकास अधिकारी डी. के. कोकरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.