केरळच्या घटनेवर पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केल्या भावना : सिंधुदुर्गातही अनेक वर्षे आहे हत्तींचे वास्तव्य
प्रतिनिधी / सावंतवाडी:
दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात हत्ती आणि माणूस यांचा संघर्ष गेली 17 वर्षे सुरू आहे. हत्तींनी जिल्हा पादाक्रांत केला होता. त्यामुळे जनतेने हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाशी संघर्ष केला. त्यानंतर हत्तींना पकडण्याची मोहीम वेळोवेळी राबविण्यात आली. त्यामुळे हत्तींचा उपद्रव कमी झाला. आता हत्ती दोडामार्गात दर्शन देत आहे. शेती-बागायतीचे नुकसान करत आहे. मात्र, सिंधदुर्ग जिल्हय़ात हत्तींविरुध्दच्या संघर्षात कधीही संघर्ष हत्तींना मारण्यापर्यंत गेला नाही. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये गरोदर हत्तिणीची अमानुष हत्या करण्यात आल्याचे वृत्त धडकताच पर्यावरणप्रेमींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.
केरळ वनखात्याचे अधिकारी मोहन कृष्णन यांनी सदर घटनेची दिलेली माहिती ऐकून पर्यावरणप्रेमी जनता हळहळली. सोशल मीडियातून या घटनेचा निषेध करतांनाच गरोदर हत्तिणीबाबत संवेदना व्यक्त करण्यात आली. माझंच चुकलं, मी माणसावर विश्वास ठेवला. आई माझी काय चूक होती गं? हा हत्तीण आणि तिच्या पिल्लातील संवाद फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यातून संवेदना हरविलेल्या माणसाबाबत तीव्र संताप व्यक्त झाला.
सिंधुदुर्गात कर्नाटकमधून 2002 ला हत्ती दोडामार्ग येथे दाखल झाले. दोडामार्गात मांगेली, शिंरंगे या गावांनी तसेच आजुबाजूच्या गावात या हत्तींनी शेती-बागायतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानीची तीव्रता वाढत गेली. प्रथम शासनाकडूनही मोठी मदत मिळत नसल्याने मानव विरुध्द हत्ती असा असलेला संघर्ष नंतर जनता विरुध्द शासन असा झाला. त्यानंतर शासनाने हत्ती पकड मोहीम बबनराव पाचपुते वनमंत्री असतांना राबविली. ही मोहीम देशात गाजली. त्यानंतर हत्ती पकड मोहीम वारंवार राबविण्यात आली. तर नुकसानीच्या भरपाईत वाढ करण्यात आली. हळूहळू हत्तींची संख्या कमी झाली. परंतु आजही दोडामार्गात हत्तींचे अस्तित्व वेळोवेळी जाणवते.
17 वर्षे वास्तव्य
हत्ती शेती-बागायतीचे नुकसान करत आहेत. त्यांनी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगर्ले, कुडाळ, कणकवली तालुक्यात नुकसान केले. जवळपास 17 वर्षे हत्तीविरुध्द संघर्ष जिल्हय़ात सुरू आहे. मात्र, नुकसान होऊनही जिल्हय़ात हत्तीचा जीव घेण्याची घटना घडली नाही. हत्तीला देवतेसमान मानले जाते. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये गरोदर हत्तिणीला ठार मारण्याची घटना जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला धडकली. या घटनेचा पर्यावरणप्रेमी जनतेकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सोशल मीडियातूनही नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
वेदनादायी घटना
सावंतवाडी येथील डॉ. गणेश मर्गज यांनी ही घटना अमानुष आहे. भुकेलेल्या गरोदर हत्तिणीला अत्यंत क्रूरपणे अननसातून फटाके घालून मारण्यात आले. असे कृत्य करणाऱया व्यक्तींचा शोध लावून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे सांगितले. गरोदर हत्तिणीला तीव्र वेदना होत होत्या. त्यातून सुटका करण्यासाठी तिने नदीचा आसरा घेतला आणि प्राणत्याग केला. या घटनेने मनाला अत्ंयत वेदना होतात, असे ते म्हणाले.
संवेदना बोथट
प्रा. सुभाष गोवेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. अशा कृत्याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगितले. तर संदीप सावंत यांनी पर्यावरणाबाबत संवेदना बोथट झाल्या आहेत. मानव आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाची हानी करत आहे. वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. केरळची घटना वेदना देणारी आहे. त्यामुळे आता सजग होऊन अशा कृत्य करणाऱयांना आळा घातला पाहिजे, असे सांगितले.