दोडामार्गवासीय 18 वर्षे भोगताहेत यातना
हत्तीबाधित क्षेत्रात पालकमंत्र्यांचा प्रथमच दौरा
शेतकऱयांकडून मोठय़ा अपेक्षा, ठोस काहीतरी हवे
बॅटरीचा मुद्दा पुन्हा नको, नवीन काहीतरी द्या
हत्ती पकड़ मोहीम, संरक्षण क्षेत्रावर चर्चा अपेक्षित
तेजस देसाई / दोडामार्ग:
एक-दोन किंवा पाच दहा नव्हे, तर तब्बल अठरा वर्षे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोरे रानटी हत्तींच्या संकटाचा सामना आहे. ही अठरा वर्षे म्हणजे बघू…अभ्यास करूच्या पलीकडे गेली आहेत. पालकमंत्री उदय सामंत हे शनिवारी प्रथमच केर गावात रानटी हत्ती नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. तातडीने निर्णय घेण्याची क्षमता असणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्याकडून येथील ग्रामस्थांना मोठय़ा अपेक्षा आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर हेदेखील त्यांच्यासोबत दौऱयावर आहेत. त्यामुळे या बैठकीत वनविभाग आपण शेतकऱयांना बॅटरी देऊ, नुकसान भरपाई देतो, तातडीने पंचनामे करतो, या पलीकडे ठोस काही उत्तर देते काय हे महत्वाचे ठरणार आहे.
केर येथील ग्रामस्थांनी आपले निवेदन तयार केले, त्यावरही चर्चा अपेक्षित आहे. आज हत्ती पकडलात ठीक आहे. पुन्हा दुसरा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनखात्याच्या तज्ञांचा ‘मास्टर प्लॅन’ 18 वर्षात तयार झाला का? की शेती केवळ नुकसान भरपाईसाठी करायची, याची उत्तरे महत्वाची आहेत. आजच्या बैठकीत ती मिळतील ही अपेक्षा आहे.
2002 मध्ये मांगेलीमार्गे रानटी हत्ती तिलारी परिसरात आले. ते आजपर्यंत स्थिरावले. सुरुवातीला हत्ती नुकसान करतात हा विषय मस्करीत सांगितल्यासारखा वाटायचा. पाऊलखुणा दाखवाव्या लागायच्या. आता थेट हत्तींचे दर्शनच होते. केर, मोर्ले, हेवाळे या हत्तीबाधित गावातील शेतकरी व लोकप्रतिनिधींनी या समस्येविषयी त्यांच्या भावना मांडल्या आहेत.
प्रभावी उपाययोजना व्हाव्यात!
सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष तथा केरचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई म्हणतात, सध्या केर-मोर्ले परिसरात एका रानटी हत्तीचा वावर सुरू आहे. त्या हत्तीला पकडल्यावर दुसऱया हत्तीचे आगमन होऊ नये. यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करायला हव्यात. शिवाय तुटपुंजी नुकसान भरपाई न देता वाढीव असावी. ज्या पिकांच्या नुकसानीचा निकषात समावेश नाही, त्यांचा समावेश करावा. हत्तीचा उपद्रव रोखण्यासाठी विशेष आराखडा बनवायला हवा.
हत्ती पकड मोहीम राबवावीच!
मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस सांगतात, आसाममध्ये खंदक खोदून त्यात खाद्य ठेवले जाते. त्यानंतर हत्ती त्या खंदकात अडकल्यावर पकड मोहीम राबविली जाते. ही पद्धत कमी खर्चिक आहे. शिवाय या भागात ते शक्य आहे. कारण हत्तीचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित आहे. हत्तीचे लोकेशन समजण्यासाठी ड्रोन कॅमेरा व शेती वाचविण्यासाठी सौरकुंपण तात्काळ देण्यात यावे. सौर कुंपणाला शंभर टक्के अनुदान द्यावे. हत्तीला चीप बसविल्यास लोकेशन समजेल, अशा अत्याधुनिक यंत्रणा वनविभागाने वापराव्यात.
हत्ती संकटापासून मुक्तता करा
मोर्ले सरपंच महादेव गवस म्हणतात, गावात गेल्या काही महिन्यांपासून टस्कर हत्तीचा वावर सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी हत्ती स्मशानभूमी, डांबरी रस्ता, मंदिराचा परिसर ते गावातील घरासमोरील अंगण असा टस्कर हत्तीचा वावर दिसून आला. एरवी जंगलात राहणारा टस्कर आता गावाच्या दिशेने येऊ लागल्याने ग्रामस्थांत प्रचंड घबराट आहे. वनविभाग नुकसान भरपाई देते. परंतु ती अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी व नागरिकांचा रोष सरपंच म्हणून आपल्याला सहन करावा लागत आहे. त्यामुळे हत्ती संकटातून मुक्तता करा.
महत्वाच्या पिकांना मिळत नाही नुकसान भरपाई
केर-भेकुर्ली गावात हत्तीपासून शेतकऱयांचे प्रचंड नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील या शेतीचा विचार करता गावातील लागवडीखालील क्षेत्र काजू, आंबा, सागवान, बांबू, फणस या महत्वाच्या पिकांचे आहे. मात्र, हत्ती नुकसानीच्या आराखडय़ात या पिकांना नुकसान भरपाईची तरतूद नाही. फळझाडे शेतकऱयांच्या उदरनिर्वाहाची प्रमुख साधने आहेत. सागवान हा तर एखाद्या इन्शुरन्स पॉलिसी
प्रमाणे कुटुंबाच्या कठीण काळात मदतीसाठी उपयोगी ठरतो. पण या झाडांची हत्तीने हानी केल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. परिणामी शेतकरी संकटात असून हत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त व्हावा, यासाठी प्रयत्न व्हावेत, असे केर- भेकुर्ली सरपंच मीनल देसाई यांनी सांगितले.
हे करावे लागेल…
तिलारी खोऱयात वाढते हत्ती संकट हे केवळ तिलारीपुरते मर्यादित नसून पुन्हा एकदा संपूर्ण सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. यासाठी पुन्हा एकदा हत्ती पकड मोहीम राबविणे गरजेचे आहे. यासाठी कुडाळमध्ये हत्ती पकड मोहीम यशस्वी करणाऱया अनुभवी अधिकाऱयांना पुन्हा एकदा सिंधुदुर्गात आणणे आवश्यक आहे. शिवाय तुटपुंज्या नुकसान भरपाईत वाढ करणे, हत्तीबाधित गावातील शेतकरी ग्रामस्थांना दरमहा निर्वाह भत्ता देणे, वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्रात खाद्य तयार करणे, हत्तीबाधित गावात संपर्क यंत्रणा मजबूत करणे, नसलेल्या शेतपिकांचा नुकसान भरपाई शासन निर्णयात समावेश करणे या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहेत. तिलारी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या तिलारी खोऱयात संरक्षित अभयारण्य करून शेतकऱयांना पुन्हा एकदा देशोधडीला लावणे योग्य ठरणार नाही. यासाठी नांगरतास घाटकरवाडी येथील 2000 हेक्टर क्षेत्रात हत्तींना पकडून पर्यटनासाठी उपयोग करणे हिताचे ठरेल, असे हेवाळेचे माजी सरपंच संदीप देसाई यांनी सांगितले.
साहेब, तुम्हीच सांगा, काय करायचं?
हेवाळेतील प्रगतशील शेतकरी भाग्येश राणे म्हणाले, आपण केळी बागायत करतो. दरवर्षी रानटी हत्तींकडून नुकसान होते. नुकसान भरपाई मार्च महिन्यापासून देण्यात आलेली नाही. तरीही आपण उपजीविका म्हणून शेती करतो. मात्र सातत्याने नुकसान होत राहिल्यास शेती करावी कशी? तुम्हीच सांगा काय करावे? त्यामुळे कायमस्वरुपी तोडगा काढावा.