सागर वाझे / बोरगाव
हत्तीच्या पावसाने नक्षत्र लागल्यापासून जिल्ह्यात कुठेही डोळा उघडलेला नाही पण या हत्तीच्या पावसाने भातसुगी सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी उभा राहिले आहे. गेली चार महिने निसर्गाच्या अवकृपेमुळे व स्वतःच्या कष्टाच्या जोरावर हाता तोंडाला आलेले भाताचे पीक कापणीच्या वेळेला उभ्या पावसात कुजू लागले आहे यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी हत्तीच्या पावसाने हतबल झाला आहे.
२४ मे ला रोहिणी नक्षत्रावर भात पेरणीला सुरुवात झाली गेल्या दहा वर्षात साधला नव्हता असा भात पेरा चालू वर्षी साधला होता. सुरुवातीच्या काळात पावसाने उघडीप दिली असली तरी निसर्गाच्या कृपेने भाताची उगवण शंभर टक्के झाली होती. १०० टक्के उगवणीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान राहत होते १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भात वाढीला अतिशय उपयुक्त ठरला. परंतु १५ सप्टेंबर नंतर भात काढणीचा हंगाम सुरू होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. हत्ती नक्षत्र निघाल्यानंतर ह्या पावसाची हजेरी रोजची ठरलेलीच त्यामुळे हाता-तोंडाला आलेलं भाताचं पीक कापणी होऊन शिवारभर पसरले असताना पावसाने मात्र पुरती दैना उडाली.
आयुष्यभर कष्ट करून आलेला हाता तोंडाचा घास पदरात घेताना शेतकऱ्याची मात्र पुरती दमछाक होत आहे. पीक पाण्यात कुजून जात आहे आणि शेतात भाताची पसर पडली आहे. खळ्यात गुडघाभर पाणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. भात हे पीक एकमेव असल्यामुळे हाता-तोंडाला आलेलं हे भात पीक शेतकर्याच्या पदरात पाडताना शेतकरी जीवाच्या आकांतानं शिवारभर सैरभैर फिरत आहे.
भाताची सुगी पाण्यात
चालू वर्षी भाताची उगवण चांगली झाली. ऑगस्ट ते सप्टेंबर चांगला पाऊस झाल्यामुळे भाताची वाढ उत्तम झाली. १५ सप्टेंबर पासून भात कापणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची शिवारभर हातघाईची घाई. खळ्यापासून ते मळणी पर्यंत तयारी परंतु १० ऑक्टोंबरला निघालेले हस्त नक्षत्र त्या नक्षत्रांनी नेहमीप्रमाणे रोज पावसाची लावलेली हजेरी यामुळे भात उत्पादकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आहे.