तीन कोटीचा निधी वर्ग करण्याची पालिकेची मागणी
प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी, विलासपूरसह इतर भाग हद्दवाढीमुळे नगरपालिका क्षेत्रात आले आहेत. यामुळे या भागातील विकास कामे रखडली आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या तिजोरीवर ताण पडत आहे. या भागांसाठी ग्रामविकास विभागाने सुमारे तीन कोटींचा निधी मंजूर केला होता. तो पालिकेकडे वर्ग करण्याची मागणी पालिका प्रशासनाने शासनाकडे केली आहे.
हद्दवाढ झाल्याने शाहूपुरी, विलासपूर येथील ग्रामपंचायती बरखास्त झाल्या. ग्रामपंचायती बरखास्त होण्यापूर्वी त्यांनी विविध कामांसाठीचे प्रस्ताव तयार करून ते जिल्हा परिषदेकडे पर्यायाने ग्रामविकास विभागाकडे सादर केले होते. हे प्रस्ताव सादर करत असतानाच त्या ग्रामपंचायतींनी सुमारे तीन कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली होती. यानुसार ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या आरखडय़ानुसार विकासकामांसाठी मागणी केलेला निधी मंजूर करत तो जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता. हद्दवाढ झाल्याने शाहूपुरी, विलासपूरसह इतर भूभाग ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतून नगरविकास विभागाच्या ताब्यात आला. यामुळे त्या ठिकाणच्या कामांसाठी ग्रामविकास विभागाने मंजूर केलेला सुमारे तीन कोटीचा निधी तांत्रिक बाबीअभावी जिल्हा परिषदेकडे अडकून पडला आहे. हा निधी मिळत नसल्याने पालिकेस हद्दवाढीतील भागात मंजूर असणारी विकास कामे मार्गी लावण्यासाठी ओढाताण करावी लागत आहे.
ग्रामविकास कडील निधीसाठी पत्रव्यवहार कोरोना, लॉकडाऊन व इतर कारणांमुळे पालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या असून, आरोग्यासाठी प्राधान्याने खर्च करावा लागत असल्याने अगोदरच शहरातील विकास कामे रखडत चालली आहेत. त्यातच हद्दवाढीतील कामांचा भार पालिकेच्या तिजारोवर पडू लागला आहे. यामुळे ग्रामविकासकडे अडकून पडलेला निधी पालिकेकडे वर्ग करण्याची मागणी पालिका करत त्यासाठीचा पत्रव्यवहार खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून नगरविकास मंत्रालयाकडे लावून धरला आहे.