मतदान केंद्रावर नागरिकांनी घातला गोंधळ, पोलिसांची कुमक मागवत जमावाला केले शांत
प्रतिनिधी /बेळगाव
मतदार यादीमधील ‘घोळ काही संपता संपेना’ अशीच काहीशी परिस्थिती मतदानादिवशीही दिसून आली. हनुमाननगर – जाधवनगर या परिसरातील 300 हून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या नागरिकांना मतदानाविनाच माघारी फिरावे लागले. या प्रकारामुळे महानगरपालिका तसेच निवडणूक आयोगाच्या कारभारावर नागरिकांनी रोष व्यक्त केला.
निवडणुकीपूर्वी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. मतदानासाठी मतदान केंद्रावर गेलेल्या नागरिकांना आपले नावच नसल्याचे दिसून आले. यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गोंधळ घातला. अधिकाधिक मराठी नावे वगळण्यात आल्याचा आरोप म. ए. समितीचे उमेदवार आशुतोष कांबळे यांनी केला.
पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक
मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांनी टीव्ही सेंटर येथील मतदान केंद्रा समोरच गोंधळ घातला. जोवर मतदानाचा हक्क मिळणार नाही तोवर मतदान यंत्र बाहेर जावू देणार नाही असा इशाराच अधिकाऱयांना दिला. गोंधळ वाढल्याने पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर अधिक कुमक मागवून घेतली. यावेळी तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे, म. ए. समितीचे मदन बामणे, यांच्यासह इतर नागरिकांनी निवडणूक अधिकाऱयांना धारेवर धरले. यामुळे पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
माजी आमदारांचे वारसदार -नगरसेविकेचेही नाव गहाळ
माजी आमदार तरळे यांचे कुटुंबीय तसेच माजी नगरसेविका निलिमा पावशे यांच्या कुटुंबाचे नाव गहाळ झाले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मतदान करूनही यावेळी मात्र नाव गहाळ झाल्याने लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी संताप व्यक्त केला. या परिसरातील अधिकाधिक मराठी मतदारांची नावे गहाळ झाली असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
अधिकाऱयांकडून नागरिकांची दिशाभूल : मनोज पावशे
वॉर्ड क्र. 32 मधील अनेक नावे गहाळ झाली आहेत. तर बरीच नावे दुसऱया वॉर्डमध्ये ढकलण्यात आल्याने शुक्रवारी सकाळपासूनच संभ्रमाचे वातावरण होते. ही बाब आम्ही निवडणूक अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली. ज्यांच्याकडे आधारकार्ड व मतदार ओळखपत्र आहे त्यांना मतदान करण्यास द्यावे, अशी भूमिका आम्ही घेतली. परंतु निवडणूक अधिकाऱयांनी ‘वरिष्ट अधिकाऱयांशी चर्चा करून तोडगा काढू’ असे थातूरमाथूर उत्तर देत नागरिकांची दिशाभूल केली.