प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यामध्ये मनसेच्या वतीने मशिदीवरील ‘भोंगा’ आणि ‘हनुमान चालिसा’ विषय शिगेला पोहोचलेला असताना रत्नागिरी शहर पोलिसांनी येथील मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धरपकड केली. मनसेच्या एका पदाधिकाऱयाच्या घरात हनुमान चालिसा म्हणण्याचा कार्यक्रम होण्याआधीच शहर पोलिसांनी रोखला. यावेळी हनुमान चालिसा पठणासाठी जमलेल्या मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह 11 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. थिबा पॅलेस येथे बुधवारी दुपारी ही कारवाई झाली.
पोलिसांनी या ठिकाणाहून मनसेचे जिल्हाध्यक्ष, जितेंद्र माधवराव चव्हाण (कडवई, संगमेश्वर), उपजिल्हाध्यक्ष रुपेश रघुनाथ सावंत (व्दारकामाई निवास, थिबा पॅलेस), शहराध्यक्ष सतीश दत्तात्रय राणे (राणे कॉलनी, नाचणे), अमोल अर्जुन श्रीनाथ (घुडेवठार), ओंकार प्रसाद सिनकर (निवखोल, रत्नागिरी), मनोज शंकर देवरुखकर (लांजा बाजारपेठ), स्वप्नील सुभाष पांचाळ, (लांजा, विलवडे, सुतारवाडी), किरण दत्ताराम चव्हाण (लांजा, हरकेवाडी), संदीप दत्ताराम मेस्त्राr (लांजा, सुतारवाडी), अनिल धोंडू गुरव (लांजा, गुरववाडी), दीपक जानू फडकरे (संगमेश्वर) यांना ताब्यात घेतले. या सर्वांना शहर पोलीस स्थानकात नेण्यात आले होते.
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरातील एका मनसे पदाधिकाऱयाच्या घरात हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. याची कुणकुण रत्नागिरी शहर पोलिसांच्या लागली. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तत्काळ सूत्रे हलविली. चौधरी आपल्या पोलीस कर्मचाऱयांसह त्या ठिकाणी दाखल झाले. मनसेच्या त्या पदाधिकाऱयाच्या घराच्या परिसरात मुस्लिम बांधवांचे वास्तव्य आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी हनुमान चालिसाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होण्यापूर्वीच रोखला.