पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघव्यवस्थापनात आत्मचिंतन सुरु
ऍडलेड / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दि. 26 डिसेंबरपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघव्यवस्थापन रवींद्र जडेजाच्या स्वास्थ्यातील प्रगतीकडे बारीक लक्ष ठेवून असून तो जर पूर्ण तंदुरुस्त असेल तर अंतिम संघात हनुमा विहारीऐवजी त्याला स्थान मिळेल, असे संकेत आहेत. जडेजाला या दौऱयातील पहिल्या टी-20 सामन्यात कन्कशनचा सामना करावा लागला आणि त्यानंतर धोंडशिरेच्या दुखापतीला देखील सामोरे जावे लागले आहे.
अर्थात, मागील काही दिवसांपासून, अगदी भारतीय संघ पहिल्या कसोटीत खेळत असताना जडेजाने हलक्या सरावाला सुरुवात केली आहे. सध्या तो उत्तमरित्या सावरत आहे. पण, मेलबर्नमध्ये शनिवारपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यासाठी तो पूर्ण 100 टक्के तंदुरुस्त होईलच, याची खात्री देता येणार नाही, अशी स्थिती आहे. तो तंदुरुस्त असेल तर मात्र आंध्र प्रदेशचा फलंदाज हनुमा विहारीला संघाबाहेर व्हावे लागेल, असे चित्र आहे. यापूर्वी ऍडलेड कसोटीत विहारीची फलंदाजी निराशाजनक राहिली. अजिंक्य रहाणे व रवी शास्त्री कोणती रणनीती आखणार, यावरही बरीच समीकरणे अवलंबून असतील.
‘जडेजा गोलंदाजीत मोठे स्पेल टाकण्याइतपत तंदुरुस्त असेल तर काही वादाचे कारणच असणार नाही. अष्टपैलू खेळाच्या बळावर जडेजाला संधी मिळेल. शिवाय, एमसीजीवरील त्या लढतीत पाच गोलंदाज खेळवण्याचा पर्यायही भारताला अमलात आणता येईल’, असे बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
जडेजा विदेशात प्रभावी
जडेजाने 49 कसोटी सामन्यात 35 पेक्षा अधिक सरासरीने 1869 धावा केल्या असून यात त्याने 1 शतक व 14 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने इंग्लंड-ऑस्ट्रेलिया भूमीतील मागील दौऱयात शानदार अर्धशतकेही साजरी केली आहेत. फक्त फलंदाजी हा एकच निकष समोर ठेवला तर ‘स्पेशालिस्ट विहारी’ व ‘अष्टपैलू जडेजा’ यांच्यात फारसा फरक नाही, हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. मोहम्मद शमी यापूर्वीच मालिकेतून बाहेर फेकला गेला असून यामुळे खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून भारताला चारऐवजी पाच गोलंदाज खेळवावे लागतील, अशी शक्यता अधिक आहे.
पावसामुळे सराव सत्र रद्द
भारतीय संघ सोमवारी ऍडलेड ओव्हलवर सराव करणार होता. पण, संततधारेमुळे हे सत्र रद्द करावे लागले. कर्णधार विराट कोहली मंगळवारी भारताकडे रवाना होत आहे.
कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा एव्हाना ऑस्ट्रेलियात क्वारन्टाईन पूर्ण करत असून दि. 3 जानेवारीपासून तो सरावाला सुरुवात करु शकेल. सध्या तो दोन रुमच्या अपार्टंमेंटमध्ये सक्तीच्या क्वारन्टाईनमध्ये आहे. न्यू साऊथ वेल्स राज्याने कडक निर्बंध लादले असून यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर व सीन ऍबॉट यांना यापूर्वीच सिडनीतून मेलबर्नमध्ये नेले केले. दुसरीकडे, बीसीसीआय मात्र क्वारन्टाईनच्या मध्यातच रोहितला सिडनीतून अन्यत्र नेऊ शकत नाही.
याशिवाय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी सिडनीमध्येच भरवण्याबाबत अद्याप महत्त्वाकांक्षी असून रोहित मेलबर्नमधील दुसरी कसोटी खेळणार नसल्याने त्याला सिडनीमधून मेलबर्नमध्ये आणण्याचे काहीच कारण नाही, हे स्पष्ट आहे. जर परिस्थिती बदलली आणि तिसरा कसोटी सामना सिडनीतून अन्यत्र हलवण्यात आला तर अशा परिस्थितीत बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करेल व आवश्यक कार्यवाही करेल, असे संकेत आहेत.
पृथ्वी शॉऐवजी केएल राहुलला खेळवा : गावसकर
सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉऐवजी भारतीय संघाने केएल राहुलला सलामीला पाठवावे, अशी सूचना महान फलंदाज सुनील गावसकर यांनी केली. शुभमन गिलला मध्यफळीत खेळवावे, असेही सनीना वाटते.
‘पुढील कसोटीसाठी दोन बदल करणे आवश्यक असेल. सर्वप्रथम सलामीवीर या नात्याने पृथ्वी शॉऐवजी केएल राहुलला खेळवणे आणि 5 व्या किंवा 6 व्या स्थानी शुभमन गिलला खेळवणे महत्त्वाचे ठरेल. जर सुरुवात उत्तम झाली तर सर्व चित्र पालटू शकते. पण, असे सकारात्मक बदल झाले नाहीत तर 0-4 अशा फरकाने भारताचा व्हॉईटवॉश निश्चित असेल. माझ्या मते उत्तम बदलाची सुरुवात मेलबर्नमधील पुढील कसोटीपासूनच होऊ शकते. फलंदाजी हा ऑस्ट्रेलियाचा कमकुवत दुवा आहे. त्याचा लाभ घ्यायला हवा’, असे गावसकर पुढे म्हणाले.
भारतीय संघ पहिल्या कसोटीतील दुसऱया डावात अवघ्या 36 धावांमध्येच गारद झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पण, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, असे गावसकर येथे म्हणाले. जर आपल्या क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडले नसते, योग्य क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी तैनात केले गेले असते तर काहीही अडचण आली नसती. टीम पेन व मार्नस लाबुशानेला स्वस्तात बाद करता आले असते. पहिल्या डावाअखेर 120 धावांची आघाडी आपल्याला सहज प्राप्त करता आली असती. अर्थात, आपण बरेच झेल सोडले आणि तेथे ऑस्ट्रेलियन संघ आपल्यापेक्षा पुढे गेला, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
पुढील कसोटी दि. 26 पासून मेलबर्नमध्ये खेळवली जाईल.