मुंबई \ ऑनलाईन टीम
शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात शनिवारी मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आली. मात्र आशिल शेलार यांच्यासोबत अशी कोणतीच भेट झाली नसल्याचा दावा संजय राऊत यांनी आज केला आहे. पण संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ”हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है”, असं सूचक विधान संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या या ट्विटची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे. या ट्वीटनंतर मात्र आग कुणाला लागली?, राऊतांविरोधात अफवा कोण पसरवत आहे? असा सवाल केला जात आहे. राऊतांना नक्की कुणाकडे बोट दाखवायचे आहे? असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे.
मुंबईतल्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना संजय राऊत आणि आशिष शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मात्र, संजय राऊत यांच्या गेल्या काही आठवड्यांमधील भेटींचा सिलसिला पाहताना या भेटीमुळे चर्चेलाही उधाण आलं आहे. या भेटीवर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मात्र संजय राऊत यांनी भेटीवरुन सध्या रंगलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहे.
संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच ती झाली असली, तरी त्यात आश्चर्य काय? महाराष्ट्रातलं राजकारण हिंदुस्तान आणि पाकिस्तानसारखं नाही, की गोळ्या घाला आणि संपवा. ज्यांना माझ्यामुळे त्रास होता, ते अशा अफवा पसरवतात. मी त्यांचं स्वागतच करतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.