20 वर्षांपासून शेतकऱयाने घेतले नाही पीक
तामिळनाडूत एका व्यक्तीने 20 वर्षांपासून स्वतःची 45 एकर जमीन मुक्या प्राण्यांसाठी तशीच ठेवली आहे. राज्यातील अविनाशी शहरातील पुदुपलायम येथे राहणारे 70 वर्षीय आर. गुरुसामी यांनी 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून गावातील स्वतःच्या 45 एकर जमिनीमध्ये हरणांमुळे कुठलेच पिक घेतलेले नाही. त्यांच्या या निर्णयामुळे या भागातील हरणांची संख्या 400 वरून वाढत आता 1,200 हून अधिक झाली आहे.
एक शेतकरी आणि निसर्गप्रेमी असल्याने मला नेहमीच प्राण्यांबद्दल आत्मियता राहिली आहे. जमिनीचा हा तुकडा मला वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिस्स्यादाखल मिळाला होता, ही जमीन खौसिखा नदीकाठावर आहे. 1996 मध्ये एक दिवस शेतात काम करत असताना काही हरणांना नदीकाठावर भटकताना पाहिले. त्यानंतर ते आमच्या कुरणांमध्ये चरू लागले आणि बकऱया आणि गायींसोबत राहू लागल्याचे गुरुसामी यांनी सांगितले.
हरणांचे घरच जणू
हरणांचे असे दृश्य गावात फारचकमी वेळा दिसून यायचे. याचमुळे मी त्यांना आमच्या गुरांमध्ये येऊ दिले. हरिण हे तृणभक्षी असल्याने आमची कुरणेच त्यांचा अधिवास ठरली. याचबरोबर माझ्या जमिनीवर तयार झालेले जंगल आता त्यांचे घर ठरले आहे. हरिणींचा हा कळप कोइम्बतूर परिसरातून आला होता असे ते सांगतात.
पूर्ण काळजी घेतात
एकेवर्षी दुष्काळ पडला असता गुरुसामी यांनी खड्डे खणून त्यात पाणी भरले होते. हरणांची शिकार करणारा कुठलाच नैसर्गिक शिकारी (वाघ, बिबटय़ा) नसल्याने त्यांची संख्या वाढत गेली आणि ती नजीकच्या शेतांमध्ये शिरू लागली. पण गुरुसामींच्या मित्रांनी त्यांना रोखले नाही.