जवळ तर चन्नी, सिद्धू अन् रंधावा होते: हरसिमरत कौर
तीन दिवसांपूर्वी पंजाब दौऱयावर पोहोचलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा श्री हरमंदिर साहिबमध्ये खिसा कापला गेला होता का असा प्रश्न उपस्थित होतोय. केंद्रीय मंत्री राहिलेल्या अकाली नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी याप्रकरणी ट्विट केला आहे.
राहुल गांधींच्या जवळ तर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा हेच हेते. मग त्यांचा खिसा कापला कुणी? हा प्रकार दरबार साहिबची बदनामी करण्याचा कट तर नाही असे हरसिमरत यांनी म्हटले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शेतकऱयांचा खिसा तर अकाली दलाने कापल्याचे विधान केले आहे.
श्री हरमंदिर साहिबमध्ये राहुल गांधी यांचा खिसा कुणी कापला? चरणजीत चन्नी, नवज्योत सिंह सिद्धू का सुखजिंदर रंधावा? या तिघांनाच झेड सुरक्षा यंत्रणेने राहुल गांधी यांच्या नजीक जाण्याची अनुमती दिली होती. अवमानाच्या घटनेनंतर सर्वात पवित्र स्थळ हरमंदिर साहिबला बदनाम करण्याचा हा कट तर नव्हे अशी विचारणा हरसिमरत यांनी केली आहे.
काँग्रेस महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी हरसिमरत कौर बादल यांच्या इंग्रजी ट्विटला प्रत्युत्तर पंजाबीमध्ये दिले. हरसिमरतजी असे घडलेच नसताना अशा खोटय़ा बातम्या फैलाविणे पवित्र गुरुघराचा अवमान आहे. निवडणुकीत विरोध चालेल, परंतु तुम्ही जबाबदारी आणि समजुतदारपणा दाखवावा. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात बसून काळय़ा कायद्यांवर मोहोर उमटविणे शेतकऱयांचा खिसा कापण्यासारखेच असल्याचे सुरजेवाला म्हणाले.