वार्ताहर / हरमल
येथील कोरकणवाडा धरण तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या परप्रांतीय मित्र गटांतील एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. केरळच्या आशिष डेरी (23 वर्षे) असे मृताचे नाव होते. गेला महिनाभर त्यांचे वास्तव्य हरमल किनारी भागांत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान,गेल्या 50 वर्षात, कोरकण धरणावर कसलीच दुर्घटना घडली नव्हती. मात्र, परप्रांतीय व विदेशी पर्यटकांनी गेल्या वर्षांपासून चालविलेल्या अनागोंदी व अश्लाघ्य प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सदर धरण तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असल्याने स्विमिंग करणाऱया तरुणांना खुणावत असते. अलीकडे कोरोनाच्या स्थितीमुळे स्थानिक जागृत ग्रामस्थांनी सदरच्या प्रकारास आक्षेप घेतला होता व पाण्यात उतरण्यासाठी बंदी लागू असल्याचे सूचना फलकावर नमूद केले होते. मात्र काल रविवार सकाळी 6 च्या दरम्यान चार जणांचा गट पाण्यात उतरला होता. मात्र अर्ध्या-एक तासाने,त्या गटातील एक जण पाण्यात गायब झाल्याचे सांगण्यास धावतच रस्त्यांवर आला, 10 मिनिटे झाली त्याचा पत्ता लागत नाही,असे त्याच्या एका मित्राने स्थानिक हॉटेल मालकास सांगितले.तो तिथून वळतो तोच अन्य दोन जणांनी त्यास उचलून दुचाकीवर बसवून नेण्याची तयारी केली. त्याचवेळेस सुदैवाने 108 रुग्णवाहिका पोचली व त्यास तातडीने इस्पितळात हलविण्यात आले. तपास अधिकारी पेडणे पोलिस उपनिरीक्षक संदीप कांदोळकर यांनी माहिती दिली.
दरम्यान, त्या धरण जलाशयाला सांस्कृतिक वैभव व श्री राष्ट्रोळी देवांचा वरदहस्त असल्याने ग्रामस्थ त्याठिकाणी ये-जा करताना देवाचा धावा करीत असतात. वर्षातून एकदा वार्षिक भंडारा उत्सव साजरा होत असतो व त्याठिकाणी स्त्रिया भविकतेने सहभागी होत असतात. मात्र गेल्या वर्षांपासून विदेशी व देशी पर्यटकांनी स्नानासाठी त्या परिसराची पवित्रता भंग केली होती त्यामुळे स्थानिक जागृत ग्रामस्थानी सुचनाफलक उभारला होता,अशी माहिती श्री राष्ट्रोली देवस्थानचे अरुण बांधकर यांनी दिली. मात्र,त्या सूचना फलकावरील सूचना कुणीही जुमानले नव्हते. शेवटी पोलिसांच्या योग्य कृतीमुळे पर्यटकांना बंदी घातली, असे बांधकर यांनी सांगितले.
यंदाच्या वषी फक्त पुरुष पर्यटक जलाशयाच्या ठिकाणी उतरत असल्याचे दिसून आले.ह्या घटनेमुळे जलाशय स्थळांची बदनामी होऊ नये ह्यासाठी जलद पावले उचलावी लागतील व आणखी दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रयत्न असेल असे ग्रामस्थ संतोष कोरकणकर यांनी सांगितले.