गोवा मानवी हक्क आयोगाचा आदेश
प्रतिनिधी /मडगाव
भर पावसाळय़ात उत्तर गोव्यातील हरवळे धबधब्यात स्नान करण्यासाठी उतरलेल्या आणि नंतर बुडून मृत्यू पावलेल्या दोन युवकांच्या मृत्यूप्रकरणी राज्याच्या पर्यटन खात्याने कोणत्याही मानवी हक्काची पायमल्ली केलेली नसल्याचा निवाडा गोवा मानवी हक्क आयोगाने दिला आहे.
दिल्ली येथील 21 वर्षीय राजेश कुमार आणि त्याचा दुसरा एक मित्र 23 ऑगस्ट 2021 रोजी हरवळे येथे सहलीसाठी गेले हाते. हरवळे येथील धबधब्यात स्नान करीत असताना कुमार याला बुडून मृत्यू आला होता. कुमार व त्याचा आणखी एक मित्र गोव्यात आले होते. गोव्यात ते कळंगूट येथे उतरले होते. सहलीसाठी म्हणून ते हरवळे येथील धबबब्यावर स्नान करण्यासाठी गेले होते. पैकी कुमार याचा मित्र स्नानानंतर बाहेर आला मात्र कुमार बाहेर न आल्याने त्याच्या मित्राने आरडाओरड केली होती आणि नंतर कुमार याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला होता.
त्यानंतर कुमार याचा मृतदेह सापडला होता. पश्चिम दिल्ली येथील उत्तम नगर येथे राहात असलेल्या राहुल कुमार या मयताच्या भावाने गोव्यात मानवी हक्क आयोगापुडे 2 सप्टेंबर 2021 रोजी तक्रार केली होती.
या तक्रारीत उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि पर्यटन खात्याच्या संचालकांना प्रतिवादी केले होते. हरवळे धबधब्यावर जीव रक्षक नसल्यामुळे आपल्या भावाचा मृत्यू झाला आणि त्यासाठी राज्य सरकारवर बेजाबदारीचा आरोप केला होता.
या तक्रारीवरुन आयोगाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी एका आदेशान्वये प्रतिवाद्याकडून अहवाल मागितला.
उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी 25 नोव्हेंबर 2021 रोजी आपला अहवाल सादर केला. याअहवालात हर्ष राजेश कुमार याला अपघाती मृत्यू आल्याचे म्हटले आहे. श्री रुदेश्वर मंदिराचे सुरक्षा रक्षक रंजन लाडू आरोलकर यांनी दिलेल्या जबाबानुसार आपले म्हणणे झुगारुन मयत पाण्यात उतरला होता आणि म्हणून मयत युवक या अपघाताला पूर्ण जबाबदार असल्याचे जबानीत सांगितले होते.
गोव्याच्या पर्यटन खात्याने या मृत्यूप्रकरणी आपला अहवाल या आयोगाला सादर केला. प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या दरम्यानच्या पावसाळय़ात समुद्र खवळलेला असल्यामुळे आणि सर्व नद्या भरती रेषेपासून वर वाहात असल्यामुळे राज्यातील सर्व समुद्रकिनारे आणि धबधब्यात जाण्यासाठी धोक्याचे असल्यामुळे जनतेसाठी बंद असतात. बुडून येण्याची ही दुर्घटना 23 ऑगस्ट 2021 रोजी पावसाळय़ात घडली होती.
गोव्यातील 41 समुद्रकिनारी पर्यटकांच्या जीव रक्षणासाठी मेसर्स दृष्टी लाईफ गार्ड प्रा. ली. यांची पर्यटन खात्याने नियुक्ती केलेली आहे. पर्यटकांचे एक आकर्षण ठरलेल्या मये तळे आणि दुधसागर धबधबा येथेही जीव रक्षक तैनात करण्यात आलेले असतात. मात्र, हरवळे येथे जीव रक्षक नसतो किंवा जारी केलेल्या निविदेत हरवळे येथील धबधब्याचा अंतर्भाव नसतो.
मात्र, प्रत्येक महाशिवरात्रीच्यावेळी हरवळे येथे जीव रक्षक तैनात करतात आणि म्हणून 23 ऑगस्ट 2021 रोजी घडलेल्या दुर्घटनेला गोव्याचे पर्यटन खाते जबाबदार नसल्याने हा मुद्दा या खात्याच्या अखत्यारित येत नसल्याचे खात्याच्या संचालकाने गोव्य्राच्या मानवी हक्क आयोगाला दिलेल्या चौकशी अहवालात म्हटलेले आहे.
आयोगाने वरील दोन्ही पक्षांचे म्हणणे तक्रारदाराला सादर केले आणि पुढील सुनावणीची तारीख तक्रारदाराला कळविली. मात्र या आयोगापुढे उपस्थित होण्यास तक्रारदाराने असमर्थता दाखवली.
सुनावणीच्यावेळी तक्रारदारातर्फे कोणीही उपस्थित नव्हता. आयोगाने समोर आलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर प्रस्तुत प्रकरणात कोणत्याही मानवी हक्काचे उल्लंघन झालेले नसल्याचे स्पष्ट करीत स्वतः धोका पत्करुन मयत हरवळे येथील धबधब्याच्या पाण्यात उतरला होता असा निवाडा दिला.
या निवाडय़ावर आयोगाचे अध्यक्ष न्या. उत्कर्ष बाक्रे, सदस्य डेस्मंड डिकॉश्ता आणि सदस्य प्रमोद कामत यांच्या स्वाक्षऱया आहेत.