प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने वाढला असून कोरानाच्या सोबतीला डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यूसारख्या रोगराईचा फैलाव सुरूच असून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहर व उपनगरांतील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत असून रोगराई नियंत्रणात आणण्यास जिल्हा आरोग्य खाते व महापालिका प्रशासनाला अपयश आल्याने शहरवासियांमध्ये धास्ती वाढली आहे.
शहरात कोरोनाच्या विषाणूंचा विळखा घट्ट आवळत चालला असून आता डेंग्यूच्या आजाराने नागरिकांना घेरले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहरात डेंग्यूच्या आजाराने त्रासलेले रुग्ण असल्याचे एप्रिल महिन्यातच निदर्शनास आले आहे. पावसाळय़ात डेंग्यूची लागण मोठय़ा प्रमाणात होत असली तरी पावसाळय़ापूर्वी या आजाराची लागण झाली असल्याचे चव्हाटय़ावर आले आहे.
जून महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
एप्रिल महिन्यात मजगाव परिसरात रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळूनही महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्तच आहे. यामुळे जून महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात नागरिकांना लागण झाली असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण वडगाव, शहापूर, मजगाव, ज्योतीनगर, कोनवाळ गल्ली, रयत गल्लीसह विविध भागातील आहेत.
ठिकठिकाणी अस्वच्छता वाढली
शहरात विविध ठिकाणी विकासकामे राबविण्यात येत असून काही ठिकाणी गटारी बांधण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. यामुळे पावसाचे पाणी साचून राहत आहे. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. पण साठवून ठेवण्यात येणाऱया पाण्यावर डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचा संशय महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत. ठिकठिकाणी अस्वच्छता वाढली आहे. परिणामी रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मनपाचे अधिकारी कोरोनाच्या नियंत्रणासाठी आणि खबरदारी घेण्यात गुंतले आहेत. त्यामुळे डेंग्यूसंदर्भात तसेच पावसाळय़ात उद्भवणाऱया रोगराईबाबत जनजागृती करून औषधोपचार करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मागील काही महिन्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही महापालिका प्रशासन ढिम्मच आहे. शहराच्या काही भागातच डेंग्यूचे रुग्ण असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात येत होते. मात्र, शहरातील प्रत्येक गल्लीत, नगरात डेंग्यूचा फैलाव झाला आहे. बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिकेला नाही.
शहरातील अस्वच्छता, दूषित पाण्याचा पुरवठा यामुळे रोगराईचा फैलाव होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. शहरातील नागरिकांचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासन उपाययोजना राबविणार का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. रोगराई रोखण्यासाठी महापालिकेने आवश्यक कारवाई हाती घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.