(अध्याय तिसरा)
कीर्तनकाराने हरिची कीर्ती जाणकार साधकाकडून मनापासून ऐकलेली असते आणि त्यामुळे तो फारच भारावून गेलेला असतो. आपण ऐकले आहे ते कीर्तनातून इतरांना कधी सांगेन असे त्याला झालेले असते. तसेच आपले कीर्तन आपल्या सद्गुरुंनीही ऐकावे अशी त्याची इच्छा असते म्हणून कीर्तनाच्या वेळेस समोरच्या श्रोत्यांना तो गुरुस्थानी मानतो. गुरुंच्या रूपात प्रत्यक्ष हरिच आपली कथा ऐकायला आलेला आहे अशी त्याची मनोमन भावना असते. हरिकृपेने कीर्तनकार व श्रोते दोघांनाही अद्वितीय ज्ञानाचा लाभ होऊन परमानंद उचंबळून येतो. हे खरे आत्मसुख. कीर्तनाच्यावेळी कीर्तनकार सदैव ईश्वराच्या कीर्तीचे गुण वर्णन करण्यात रंगून गेलेले असतात आणि श्रोतेही त्यात न्हाऊन निघतात व पुलकित होतात. हा असा अवर्णनीय सोहळा चाललेला असताना उभयतांची तहानभूक हरपते. सुखाच्या राशी आपल्यातूनच निर्माण होतात हे लक्षात येते. ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होते. अशा आत्मसुखाची गोडी एकदा लागली की दुःखाच्या राशी जळून जातात व भक्ताला संपूर्ण स्वानंद प्राप्त होतो. हे सर्व हरिकथेतून साधले जाते. नामदेवांनी तर आत्मसुखाचे अभंगच रचले आहेत व कीर्तन कसे असावे त्याचे सविस्तर वर्णन खालील अभंगात केले आहे. बोलूं ऐसे बोल । जेणें बोलें विठ्ठल डोले ।।1।।प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचे विठ्ठल रखुमाई ।।2।।परेहूनि परतें घर । तेथें राहूं निरंतर ।।3।।सर्वांचें जें अधि÷ान । तेंचि माझें रूप पूर्ण ।।4।।नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं ।।5।। सर्व सत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ।।6।। विठ्ठलाबाबत अतीव प्रेम दाटून आल्याने मुखात सदैव त्याचे नाव असावे. सदैव त्याचाच ध्यास असल्याने निश्चितच परेच्या पलीकडल्या घरात म्हणजे विष्णू जिथे निवास करतो तो विष्णुलोक इथेच अवतरला आहे असे त्यांना वाटते कारण प्रत्यक्ष विठ्ठल उपस्थित असून आनंदाने डोलत असतो आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. आत्मसुखाची गोडी एकदा लागली की दुःखाच्या राशी जळून जातात व भक्ताला संपूर्ण स्वानंद प्राप्त होतो. स्वानंद मिळणे हाच हरिकथेचा महिमा आहे हृदयामध्ये हरी प्रकट झाला की डोळय़ातून आनंदाश्रू ओघळू लागतात, अंगावर रोमांच उभे राहतात, गहिवरून येते, आनंदाने हसूही येते. तो म्हणतो, ‘आजपर्यंत देहाच्या अहंकारामुळे मोह आणि मदाने ग्रस्त झालो होतो गुरुंनी बोध केला, कृपा केली त्यामुळे मुक्त झालो.’ असे म्हणून तो परमानंदाने डोलू लागतो. शिष्याची प्रगती पाहून सद्गुरुंना आनंदाचे भरते येते. म्हणून सद्गुरुंना शरण जाऊन भागवतशास्त्राचा भक्तीने अभ्यास करावा, म्हणजे मायेची शक्ती बाधू शकत नाही. कारण हरिनामाचा गजर ऐकून ही माया पळून जाते. अर्षभ प्रबुद्ध म्हणाले, ‘राजा, अशी ही दुस्तर माया कशी तरून जायची तू विचारत होतास ना? तर त्याला ‘भगवत भक्ती’ हे अमोघ अस्त्र आहे, हे तू निश्चित समज. अमोघ म्हणजे लक्ष्याचा अचूक वेध घेणारे शस्त्र.’ हे सर्व ऐकून राजा अतिशय आनंदित झाला आणि त्या आनंदातच परब्रह्म स्वरूपाबद्दल विचारू लागला.
क्रमशः