ऑनलाईन टीम / मुंबई :
एस नरवल नावाचा हरियाणाचा दुधवाला पाच वर्षात 7 हजार कोटींचा मालक कसा होतो. मी ईडीला विचारतो की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला, 7 हजार कोटांचा मालक बनला. कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून त्याचं महाराष्ट्रात येणं जाणं सुरु झालं. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणं जाणं सुरु होतं आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केलं मनी लाँड्रिंग याचं उत्तर मला ईडीने द्यावं, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला. पत्राचाळची जमीन खरेदी करणारा मोहित कंबोज होता. या व्यवहारात पीएमसी घोटाळ्यातील रक्कम वापरली गेली. पीएमसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवानने भाजपला 20 कोटी दिले आहेत. ज्याच्याशी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाचे आर्थिक संबंध आहेत. सोमय्यांच्या गैरव्यवहारांची कागदपत्रे तीन वेळा ईडी कार्यालयात देऊनही कारवाई झालेली नाही.
किरीट सोमय्या हे ईडीचे दलाल आहेत. त्यांनी आरोप केला होता की, ठाकरे कुटुंबानं अलिबागमध्ये कोरलाईत 19 बंगले बांधले आहेत. ती बेनामी संपत्ती आहे. आपण चार बसेस करुन या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. तिथे ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि बंगले तिथे नसतील तर मी त्याला जोडय़ाने मारेन, असे थेट आव्हान यावेळी राऊत यांनी दिले.