पोलीस-प्रशासनावर कारवाई करण्यासाठी सरकारला 6 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम
कर्नाल / वृत्तसंस्था
हरियाणाच्या कर्नाल येथील महापंचायतीमध्ये शेतकरी नेत्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. लाठीचार्ज केल्यानंतर मृत झालेल्या शेतकऱयाच्या कुटुंबाला 25 लाखांची भरपाई आणि वारसाला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच जखमी झालेल्या शेतकऱयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई मिळायला हवी, असेही म्हटले आहे. याव्यतिरिक्त लाठीचार्जला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्यात यावी असे जाहीर करत आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी नेत्यांनी सरकारला 6 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 7 सप्टेंबरला ते कर्नालमध्ये शेतकरी महापंचायत बोलावतील, असेही स्पष्ट केले आहे.
हरियाणातील कर्नाल येथील शेतकरी नेत्यांनी महापंचायतीच्या माध्यमातून सरकारला घेरले. शेतकऱयांवर पोलीस लाठीचार्ज संदर्भात हजारो शेतकरी घरौंडा धान्य बाजारात जमले होते. महापंचायतीमध्ये 12 ते 2ः30 पर्यंत सुमारे 23 शेतकरी नेत्यांनी भाषणे दिली. यावेळी बऱयाच जणांनी आपली मते व्यक्त केली. शेतकऱयाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या ‘एसडीएम’ला बडतर्फ करावे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी संयुक्तपणे केली. तसेच मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी शेतकऱयांची माफी मागावी, असेही शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. महापंचायतीमध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशच्या 40 शेतकरी संघटनांचे नेते शेतकरी गटांसह घारौंडा येथे पोहोचले होते. येथील शेतकरी आणि संघटनांना राकेश टिकैत यांच्या उपस्थितीची अपेक्षा होती. मात्र, ते सोमवारी येथे झालेल्या महापंचायत सभेला पोहोचू शकले नाहीत.