मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी आंदोलन झाल्याने तणाव
@ कर्नाल / वृत्तसंस्था
हरियाणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर ठिकठिकाणी संतप्त पडसाद उमटले आहेत. या लाठीमारात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. काही शेतकरी आंदोलक रक्तबंबाळ झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनीही केंद्र सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीबाहेर निदर्शने करणाऱया शेतकऱयांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यानंतर कर्नालमध्ये शेतकऱयांनी निदर्शने करत राष्ट्रीय महामार्ग रोखला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला. बस्तर टोल प्लाझावर आंदोलक पोहोचल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. शेतकरी नेत्यांनी हरियाणा आणि आजूबाजूच्या राज्यांत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याची सूचना केल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी बैठक आयोजित केली होती. कर्नालमधील प्रेम प्लाझा हॉटेलमध्ये ही बैठक होणार होती. शेतकऱयांनी तेथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे जाण्यापासून त्यांना रोखण्यात आल्यानंतर शेतकऱयांनी बस्तर टोल प्लाझावर महामार्ग रोखला. निदर्शकांनी भाजप नेत्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस बंदोबस्त कडक असल्याने आंदोलन उधळण्याचा प्रयत्न झाला.