सरकारच्या निर्णयानंतर संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलन मागे
चंदिगढ, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हरियाणा आणि पंजाबमध्ये भात (धान) खरेदी रविवारपासून सुरू होणार आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांशी बोलल्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. हरियाणात भात खरेदीला झालेल्या विलंबाच्या निषेधार्थ शेतकरी शनिवारी रस्त्यावर उतरले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानालाही घेराव घातला होता. मात्र, सायंकाळी भात खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.
भात खरेदीच्या निर्णयासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर शनिवारी दिल्लीला गेले होते. यादरम्यान केंद्रीय अन्न आणि पुरवठा राज्यमंत्री अश्विनी चौबे आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यात बैठक झाली. त्यानंतर हरियाणा आणि पंजाबमध्ये भाताची खरेदी उद्यापासून सुरू होईल, असे स्पष्ट केले. मान्सूनच्या विलंबामुळे केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरऐवजी 11 ऑक्टोबरपासून भात खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने गुरुवारी पंजाब आणि हरियाणामध्ये भात खरेदी 11 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली होती. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱयांनी भात खरेदीच्या विलंबाच्या निषेधार्थ शनिवारी अनेक ठिकाणी निदर्शने केली. शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाने दोन्ही राज्यांच्या आमदारांच्या घरासमोर निदर्शने करण्याची हाक दिली होती. खरेदीला विलंब झाल्याच्या मुद्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल येथील निवासस्थानी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱयांना रोखण्यासाठी पाण्याच्या फवाऱयांचा वापर करण्यात आला.