वार्ताहर/ हर्णे
मासेमारीसाठी 1 जूनपासून पावसाळी बंदी कालावधी सुरु होत असल्यामुळे मच्छिमारांनी आपाल्या नौका किनाऱयावर सुरक्षित ठेवायला सुरवात केली आहे. हर्णै बंदरातील सुमारे 90 टक्के नौका किनाऱयावर विसावल्या असून उर्वरित नौकाही येत्या 4 दिवसात किनाऱयावर येणार आहेत. यामुळे कायम गजबजलेले हर्णै बंदर दोन महिने सुने होणार आहे.
दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात सुमारे 800 नौका मासेमारीसाठी उभ्या असतात. येथील बंदरातील मच्छी मुंबई, पुणे, गोवा, मेंगलोर, कोचिन आदी ठिकाणी पाठवण्यात येते. खुल्या लिलाव पद्धतीमुळे येथे पर्यटक, हॉटेल व्यावसायिक ताज्या मासळीसाठी थेट येत असतात. त्यामुळे मच्छिला चांगला दर मिळत असतो. मात्र यावर्षी वादळ, वारे, मत्स्य टंचाईसारख्या कारणांमुळे त्रस्त झालेल्या मच्छीमारांना कोरोना काळातील लॉकडाऊनने अधिकच फटका दिला. मात्र पावसाळी बंदी कालावधीचा विचार करून शासनाने मच्छीमारांना दुसऱया लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून व्यवसाय करण्यास सूट दिली. तरीही कोरोनाची धास्ती आणि लिलाव बंदी, हॉटेल, पर्यटक बंदीसारख्या कडक नियमांमुळे मासळीला अपेक्षित दर मिळणार नाही. या कारणामुळे 70 टक्के नौका बंदच ठेवल्या होत्या. काही नौकांनी मात्र मासेमारी सुरु केली होती.
दरम्यान, पावसाळी बंदी कालावधीजवळ आल्याने हर्णै बंदरातील मच्छिमारांनी बोटीं किनाऱयाला आणायला सुरवात केली आहे. जेटी अभावी या नौका आंजर्ले खाडी, दाभोळ, खाडीत विसावल्या आहेत, तर काही नौका हर्णै बंदरात किनाऱयावरच उभ्या केल्या जात आहेत. पूर्वी या नौका किनाऱयावर ओढत आणण्यासाठी 40 ते 50 कामगार एका नौकेसाठी लागत असत. मात्र आता हे काम ट्रक्टरमुळे अधिक सुलभ आणि कमी खर्चिक झाले असल्याचे येथील मच्छिमारांनी सांगितले.