मडगावातील हिंदू धर्म प्रेमींची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
कर्नाटकातील शिवमोग्गा येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्वांना फासावर लटकवा अशी मागणी काल मडगाव परिसरातील हिंदू धर्म प्रेमींनी केली. हिंदू युवकांनी हर्षाच्या हत्येचा निषेध करून त्यांना मडगाव पालिका उद्यानाजवळ श्रद्धांजली वाहिली.
हर्षाने सोशल मिडियावर एक पोस्ट टाकला होता. या एका पोस्टमुळे त्यांची हत्त्या करण्यात आल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. एका पोस्टची ही सजा असेल असे आम्ही कधीच गृहित धरले नव्हते. आज जर एका युवकाचा अशा प्रकारे बळी जात असेल तर प्रत्येकांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात आज प्रत्येकाने जागृती करण्याची गरज आहे. या पूर्वी तामिलनाडूत असाच प्रकार ‘लावण्या’च्या संदर्भात घडला होता. देशात जर असे प्रकार घडू लागले तर आमचे भवितव्य काय असेल याचा विचार सुद्धा आम्ही करू शकत नाही. आज हर्षाच्या बाबतीत आम्ही गप्प बसून चालणार नाही. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावले पाहिजे असे मत यश कंटक यांनी यावेळी मांडले.
‘आम्ही त्यांच्या विरूद्ध’ अशा विचारसरणीच्या प्रभावातून हर्षाची हत्त्या करण्यात आली आहे. आम्ही सर्वजण आज येथे एकत्र आलो आहोत ते केवळ राष्ट्रीय हितासाठी. आज एक पोस्ट इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर टाकला तर आपण येवढे असुरक्षित आहोत का ? येवढी खतरनाक परिस्थिती आपल्या देशात आहे का ? आपल्या देशात लोकशाही नांदते, आम्ही आमची विचारसरणी बदलली पाहिजे. त्यात राष्ट्रभक्ती असेल तर असे प्रसंग सहज टाळणे शक्य आहे. देशात समान नागरी कायदा असला पाहिजे व केंद्र सरकार नक्कीच समान नागरी कायदा अंमलात आणतील. त्यावेळी अशा गोष्टींना कुठेच थारा राहणार नाही असे मत सागर रेवणेकर यांनी मांडले.
सद्या ‘हिजाबा’वरून काही ठिकाणी वाद सुरू आहे. हा वाद तसे पहाता छोटासा आहे. हिजाबावरील एका पोस्टामुळे एक बळी जातो. एखाद्याचा बळी जाणे, त्यांच्यासाठी महत्वाचा नाही तर त्यांच्यासाठी हिजाब महत्वाचा आहे. देशात समान नाकरी कायदा असला पाहिजे व तो नक्कीच येईल. शाळेत जाताना सर्व मुले एकाच प्रकारचा गणवेष घालतात, आपल्याला पाहिजे तसा गणवेष घालता येत नाही. सर्व जाती-धर्मातील मुलांसाठी तो समान असतो. अशावेळी हिजाब त्यांना महत्वाचा वाटतो आणि त्यातून हर्षाचा बळी घेतला आहे. हा विषय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. आज अल्पसंख्याक आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगून रस्त्यावर उतरतात व हिंदूवर हत्याचार करतात हे किती काळ सहन करून घेतले जाईल असा सवाल यावेळी राजू झा यांनी उपस्थित केला.