कोविड-19 च्या विरोधात संपूर्ण देश कडवी झुंज देण्यात गुंतला असताना इकडे अचानकपणे विशाखापट्टणम येथील रासायनिक कारखान्यातील गॅसगळती दुर्घटनेमुळे देश पुन्हा एकदा हादरला. या गॅसगळतीत 11 जण हकनाक मृत्युमुखी पडले तर एक हजारहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या दुर्घटनेच्या निमित्ताने सुरक्षेसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न समोर आले असून एका अर्थाने ते हलगर्जीपणाचे बळी ठरले आहेत. कोरोना विषाणूचे पिशाच्च मानगुटीवर असताना गॅसगळतीचे नवे भूत उभे ठाकल्याने सरकारची अवस्था अधिकच भांबावल्यासारखी झाली. सध्याच्या भीतीदायक वातावरणातच गुरुवारी मध्यरात्री विशाखापट्टणम येथील एलजी पॉलिमर्स या कंपनीच्या प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाली. गडद अंधारात गॅस वेगाने पाच किमीच्या परिसरात पसरला. नागरिक झोपेत होते. श्वास घेण्यात अडचण होऊ लागल्याने ते गोंधळून उठले. काहीच कल्पना येत नसल्याने घाबरून घराबाहेर पडले. काहीजण झोपेतच बेशुद्ध पडले, दगावले. काही चालण्याचा प्रयत्न करत होते. पण ते रस्त्यातच कोसळले. फुटपाथवर, रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे लोक पडलेले दिसत होते. घटनास्थळ परिसरातील एकूणच दृश्ये मनाचा थरकाप उडवणारी होती. मनुष्यहानीबरोबरच पक्षी, प्राणी व जनावरेदेखील या विषारी वायूला बळी पडले. अशाच प्रकारच्या आणखी दोन दुर्दैवी घटना छत्तीसगड व तामिळनाडू येथे घडल्या त्याही गुरुवारीच. टाळेबंदीमुळे दीर्घकाळ बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू करताना एका दिवसात अपघाताच्या तीन घटना घडल्यामुळे प्रशासनाला सतर्कतेचा इशारा मिळाला. चिंतेची बाब म्हणजे देखभाल-दुरुस्ती करताना या दुर्घटना घडल्या आहेत. कारखाने सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेची कशी काळजी घ्यावी, याबाबतची ही धोक्याची घंटा समजली पाहिजे. छत्तीसगड येथील पेपरमिलमध्ये टाकी स्वच्छ करत असताना अचानक गॅसगळती झाल्याने 3 कामगारांना अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तामिळनाडूतील नेइली निग्लाईन कार्पोरेशन प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाल्याने 7 कामगार गंभीररित्या जखमी झाले. स्फोट झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर येताना दिसत होता. थंड पडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योगधंदे सुरू होणे आवश्यक आहे. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु औद्योगिक क्षेत्र दीर्घकाळानंतर पुन्हा सुरू करताना आपण एखाद्या विषारी वायुगळतीची अथवा स्फोटाची बटणे तर दाबत नाही ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण 35 वर्षांपूर्वी हलगर्जीपणामुळे झालेल्या वायुगळतीच्या काळय़ा स्मृती अजूनही ताज्या आहेत. 1984 मध्ये घडलेली भोपाळ गॅसगळती दुर्घटना हे अक्षम्य बेजबाबदारपणाचे उदाहरण होते. भयाण रात्रीत मृत्यूचे तांडव, करुण किंकाळय़ा आणि आक्रोशाच्या आठवणी आजदेखील अंगावर शहारे उमटवतात. दुर्दैवाने जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना भारतात घडली. भोपाळ येथील युनियन कार्बाईड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रकल्पातून तब्बल 40 टन मिथाईल आयसोसायनाईट या अत्यंत विषारी वायूची पहाटेच्या सुमारास गळती झाली. काही अवधीतच हा वायू शहरात घुसला. निद्रादेवीच्या आधीन झालेले लोक श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. धोक्याची सूचना देणारा भोंगा अपेक्षित असताना काही तास तो वाजलाच नाही. कित्येक तास शहरात अनागोंदी व गोंधळ माजला होता. या दुर्घटनेत तब्बल 5,000 लोक तडफडून मेले तर 6 लाख लोकांना विषारी वायूची बाधा झाली. शिवाय दीर्घकाळ शारीरिक दुष्परिणाम झाले ते वेगळेच. विशाखापट्टणम येथील कंपनीतून स्टायरीन वायूची झालेली गळती आणि भोपाळ गॅसगळती प्रकरणात अनेक साम्यस्थळे आहेत. सुरक्षेबाबत दाखवलेला टोकाचा बेजबाबदारपणा, मध्यरात्री वायुगळतीनंतर न दिलेला धोक्याचा इशारा, सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दाखवलेला अक्षम्य निष्काळजीपणा, व्यवस्थापन आणि सरकारकडून वायुगळतीची दिलेली गुळमुळीत कारणे आणि व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. राष्ट्रीय हरित लवादाने गॅसगळतीची गंभीर दखल घेत कंपनीला मनुष्यहानी संदर्भात 50 कोटींची रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत, हे बरे झाले. वास्तविक 40-45 दिवसांच्या दीर्घकाळानंतर प्रकल्प सुरू करत आहे, याची जाणीव कंपनी व्यवस्थापनाला हवी होती. कोणत्याही क्षणी विषारी वायूत रुपांतर होऊ शकणारे 1800 टन संयुग टाकीमध्ये साठवले आहे. परिणामी इतक्या दिवसांच्या कालावधीत यामध्ये रासायनिक क्रिया घडून विषारी वायूची निर्मिती होऊ शकते याची पूर्वकल्पना कंपनीतल्या तज्ञांना असायला हवी होती. परंतु सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेतली नाही. व्हॉल्व सुरू करण्याची यंत्रणा व्यवस्थित हाताळली नसल्याने ही दुर्घटना घडली. अकुशल कामगारांकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यांच्या अज्ञानामुळे गॅसगळती झाली, अशी माहिती आता पुढे येत आहे. कंपनी व्यवस्थापन, नोकरशहा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातील लागेबांधे यथावकाश बाहेर येतीलच. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशभरातील टाळेबंदी उठण्यास आता काही दिवसाचा कालावधी उरला आहे. उद्योग बंद आहेत. टाळेबंदीनंतर लहानमोठय़ा उद्योगांची चाके धडधडायला लागतील. दीर्घकालाच्या टाळेबंदीमुळे उद्योग जगताचे कंबरडे मोडले आहे. मंदी, आर्थिक नुकसान आणि कामगार टंचाईमुळे कारखान्यांच्या किरकोळ दुरुस्ती व देखभालीकडे कित्येकांचे दुर्लक्ष झाले असणार. बेपर्वाई व दुर्लक्षामुळे सार्वजनिक सुरक्षेचे कसे तीनतेरा वाजू शकतात, या दृष्टिकोनातून विशाखापट्टणम येथील वायुगळती दुर्घटनेकडे पहावे लागेल. लॉकडाऊननंतर विविध उद्योग विशेषत: रासायनिक कारखाने सुरू करताना दुरुस्ती व देखभालीचे योग्य काळजी घेण्याची गरज यातून अधोरेखित झाली आहे हे मात्र निश्चित.
Trending
- केजरीवालांच्या कोठडीत 7 मेपर्यंत वाढ
- स्टोइनिसची शतकी खेळी ऋतुराजवर ठरली भारी
- ‘आयुष्मान’ अंतर्गत उपचार खर्च होणार दुप्पट
- दिल्लीचा सामना आज गुजरातशी
- ‘व्हिआय’च्या एफपीओसाठी प्रति इक्विटी समभाग 11 रुपयाच्या ऑफरला मंजुरी
- भाजपचे मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेसचे मित्रपक्ष
- मोदी श्रीरामाच्या विरुद्ध मार्गावर!
- ब्रिटनच्या संसदेत रवांडा डिर्पोटेशन बिल संमत