प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता मूळ वादावरच निकाल लागणार होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी सोमवारी पुन्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयाच्या नजरेला काही खोटय़ा गोष्टीच दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱयांनी कधीच कोणत्याही यंत्राची नासधूस केली नाही. कधीच अधिकाऱयांवरदेखील अरेरावी केली नाही. असे असताना शेतकऱयांनी यंत्रांची नासधूस केली, असेदेखील न्यायालयात मांडण्यात आले आहे. एकूणच न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांकडून होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
वास्तविक, या खटल्याचा निकालच होणार होता. मात्र निकालावेळीच पुन्हा युक्तिवाद केला गेला आहे. याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारी युक्तिवाद झाला असून मंगळवारी न्यायाधीश काय निकाल देणार? याकडे साऱयांचे लक्ष लागून आहे. याचबरोबर शेतकऱयांनीही पुढील तयारी केली असून कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता करू देणार नाही, यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.