म्हणे मनाई हुकूम उठला : शेतकऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात उच्च न्यायालयाने मनाई दिली होती. असे असताना पुन्हा हा रस्ता करण्यासाठी पोलिसांकरवी दडपशाही सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत काही शेतकऱयांनी जाब विचारताच पोलिसांनी तेथून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे नोटिफिकेशन करताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन अडचणीत आले. झिरो पॉईंट ते मच्छे असा उल्लेख करण्यात आला होता. फिशमार्केट जवळून हा झिरो पॉईंट मच्छे गावाला जातो. असे असताना अलारवाड क्रॉसपासून शहापूर, वडगाव, मजगाव, जुने बेळगाव, येळ्ळूर या परिसरातून हा रस्ता जात आहे.
नोटिफिकेशनमध्ये केलेला उल्लेख आणि सुरू केलेले काम यामध्ये मोठी तफावत आहे. याबाबत उच्च न्यायालयामध्ये शेतकऱयांच्या बाजूने ऍड. रवी गोकाककर यांनी आपली बाजू मांडली होती. त्यानंतर न्यायालयाने या रस्त्याला मनाई दिली होती. त्यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजूनही न्यायालयात मनाई हुकूम असताना अचानकपणे पोलीस तेथे जाऊन तुमच्या दाव्यातील मनाई हुकूम खारीज झाला आहे, असे सांगून दिशाभूल करत आहेत. याबाबत शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून यापुढे जर अशा प्रकारे शेतकऱयांची दिशाभूल करण्यात येत असेल तर शेतकरी गप्प बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयात दावा असताना अशा प्रकारे जमीन हिसकावून घेणे हे कायद्याच्या चौकटीत बसते का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.