शेतकऱयांना फसविण्यासाठी दिली होती रक्कम : न्यायालयाच्या आदेशाने एजंटांनाच बसला दणका
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकार प्रयत्न करत होते. शेतकऱयांना वेगवेगळी आमिषे दाखविली. मात्र शेतकऱयांनी त्याला दाद दिली नाही. काही एजंटांना शेतकऱयांची दिशाभूल करण्यासाठी पाठविले. तुमच्या जमिनीला अधिक रक्कम देतो, तुम्ही जमिनीचा हट्ट सोडा, असे सांगून काही शेतकऱयांना स्वतःकडील पैसे एजंटांनी गुंतविले होते. मात्र न्यायालयाने रस्ता करण्यास स्थगिती दिली. याचबरोबर नोटिफिकेशनच रद्द केल्यामुळे या एजंटांना चांगलाच दणका बसल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता सुपीक जमिनीतून करण्यात येत होता. त्या रस्त्याला जोरदार विरोध करण्यात आला. मात्र तरी देखील शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱयांनी त्याविरोधात धारवाड येथील खंडपीठाकडे दावा दाखल केला. त्या ठिकाणी शेतकऱयांची बाजू उचलून धरत रस्त्याला स्थगिती दिली होती. शेतकऱयांच्या बाजूने ऍड. रवी गोकाककर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
त्यानंतर नुकतीच बेंगळूरच्या उच्च न्यायालयाने नोटिफिकेशनलाच स्थगिती दिली. त्यामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला. मात्र शेतकऱयांच्या दारोदारी फिरणारे एजंट चांगलेच अडचणीत आले आहेत. शेतकऱयांच्या घरी जावून आज ना उद्या तुमची जमीन जाणारच आहे. त्यापेक्षा तुम्हाला अधिक रक्कम मिळवून देतो. तुम्ही स्वाक्षरी द्या, असे सांगून काही शेतकऱयांना आगावू रक्कम दिली गेली आहे. काही शेतकऱयांनी रक्कम घेतली. त्याचबरोबर सरकारकडून आलेलीही काही शेतकऱयांनी रक्कम घेतली. मात्र बहुसंख्य शेतकऱयांनी त्याला विरोध केला होता.
गेल्या महिन्याभरात देखील पुन्हा एजंट सक्रिय झाले होते. अनगोळ परिसरातील शेतकऱयांना आमिषे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र सदर जमिनींवर स्थगिती आदेश असल्यामुळे एजंट देखील अडचणीत आले. तुम्ही स्थगिती उठवा आम्ही रक्कम देवू, असे देखील काही जण सांगत होते. आता तर नोटिफिकेशनच रद्द केल्यामुळे हे एजंट चांगलेच अडचणीत आले आहेत. तर शेतकऱयांनी नोटिफिकेशन रद्द झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.