शेतकरी जमा होताच घेतला काढता पाय
प्रतिनिधी / बेळगाव
मच्छेजवळील एका शेतकऱयाला तुझ्या पिकाची नुकसानभरपाई देतो पण रस्ता करण्यास जागा द्या, असे सांगून शेतकऱयाची मनधरणी करण्याचा प्रयत्न बुधवारी झाला. यावेळी संबंधित शेतकऱयाने आमिषाला बळी न पडता मी कोणत्याही परिस्थितीत रस्त्याला जागा देणार नाही, असे ठणकावून सांगितले. याचबरोबर याची माहिती मिळताच शेतकरी जमा झाले. त्यामुळे अधिकाऱयांनी तेथून काढतापाय घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण अधिकारी आणि बायपासचा ठेकेदार मच्छे येथे गेले. तेथे त्यांनी अनिल अनगोळकर या शेतकऱयाला बोलावून घेतले. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पिकाची नुकसानभरपाई देवू पण तुमच्या शेतातून पुढे जायला जागा द्या, अशाप्रकारे त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र त्या शेतकऱयाने कोणत्याही परिस्थितीत आम्ही जागा देणार नाही, असा पवित्रा घेतला. याची माहिती काही शेतकऱयांना समजताच त्या ठिकाणी शेतकरी जमा झाले. शेतकरी जमा होताच ठेकेदार आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी तेथून पळ काढला.
आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही. हवे तर रक्तसांडू पण जमीन देणार नाही, असे शेतकऱयाने सुनावले. शेतकऱयांच्या सुपीक जमिनीतून रस्ता करण्यापेक्षा पर्यायी मार्गातून रस्ता करावा. त्याला आम्ही सहकार्य करू, मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी जमीन देणार नाही, असे शेतकऱयांनी ठासून सांगितले. सध्या हा खटला न्यायालयात आहे. त्यामुळे कोणीही यामध्ये हस्तक्षेप करू नये. अन्यथा शेतकरी तुम्हाला हिसका दाखवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.