कायमस्वरूपी हा रस्ता बंद करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता अत्यंत सुपिक जमिनीतून गेला आहे. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. सध्या या रस्त्याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले आहेत. तरीदेखील हा रस्ता करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी तणावाखाली आहेत. तेव्हा कायमस्वरूपीच हा रस्ता बंद करावा, अशी मागणी शेतकऱयांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱयांनी विविध मागण्यांसाठी सुवर्णसौधसमोर आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, आम्हाला निवेदन द्यायचे आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणा, अशी आग्रही भूमिका शेतकऱयांनी घेतली. त्यामुळे शेतकऱयांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यावेळी विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नाईक, राजू मरवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.