अर्थमंत्री पेपरलेस बजेट सादर करणार, ऍपवरही अपडेट होणार ठळक मुद्दे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढील आठवडय़ात सादर होणाऱया अर्थसंकल्पावर अंतिम हात फिरविताना यंदा पारंपरिक हलवा समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला नाही. दरवर्षी अर्थसंकल्पाची अंतिम प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित केला जात होता. मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गामुळे कोविड प्रोटोकॉलचे पालन करून मिठाईचे वाटप करण्यात आले.
सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, सध्याची साथीची परिस्थिती पाहता हलवा समारंभ करण्यात आलेला नाही. त्याऐवजी, मुख्य कर्मचाऱयांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करून मिठाई देण्यात आली. अर्थ विभागात सेवा बजावणारे कर्मचारी बजेट बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आता संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच हे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या संपर्कात येतील. अर्थसंकल्प गोपनीय ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी अशाप्रकारे सावधगिरी बाळगली जाते.
मागील वर्षापासून अर्थसंकल्प पेपरलेस करण्यात आला असून तो यंदाही कायम राहणार आहे. संसद सदस्य आणि सामान्य जनतेला अर्थसंकल्पाची आवश्यक कागदपत्रे सहज मिळावीत यासाठी ‘केंद्रीय बजेट मोबाईल ऍप’ सुरू करण्यात आले आहे. गतवषीप्रमाणे यंदाही बजेटची कागदपत्रे ऍपवर उपलब्ध होणार आहेत. मोबाईल ऍप इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टलवर सामान्य लोकांसाठी बजेट दस्तावेज डाउनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध असतील. हे ऍप केंद्रीय बजेट वेब पोर्टल www.indiabudget.gov.in वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते.
ऍपवर उपलब्ध सुविधा…
बजेट दस्तऐवज
बजेट ठळक मुद्दे
बजेट भाषण
बजेटची झलक
वार्षिक वित्त विवरण
सोनियांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेतील नेत्यांसोबत ही बैठक झाली. या बैठकीत 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात येणाऱया विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अधिवेशन काळात विविध मुद्दे मांडण्यासाठी काँग्रेस इतर समविचारी विरोधी पक्षांसोबत काम करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकऱयांचे प्रश्न, चीनच्या सीमेवरील तणाव आणि बदललेली परिस्थिती, कोरोनाचे संकट यावर बैठकीत चर्चा झाली. या सर्व मुद्यावर काँग्रेस लोकसभा आणि राज्यसभेत आवाज उठवणार आहे. तसेच अन्य काही मुद्दे देखील काँग्रेसकडून संसदेत मांडले जाणार आहेत.