म. ए. समिती कार्यकर्त्यांकडून अधिकारी धारेवर : आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /खानापूर
ऐन दिवाळीमध्ये हलशी भागातील विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बिडी येथील हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला तसेच या पुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून हलशी, नंदगड, हलगा, मेरडा आदी भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित होणे नित्याचे बनले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून एखाद्या गावामधील वीजपुरवठा खंडित होताच लोकांनी हेस्कॉम कार्यालय किंवा लाईनमनशी संपर्क साधला असता बिडी येथील सब स्टेशनमधून वीजपुरवठा खंडित केला जातो अशी माहिती दिली जाते. मात्र वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण वेगळेच असते. त्यामुळेच म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी बिडी येथील कार्यालयात जाऊन जाब विचारला.
यावेळी येथील कर्मचाऱयांनी हलशी किंवा इतर भागात समस्या निर्माण झाल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्याची सूचना केली जाते. त्यामुळे आपण वीजपुरवठा बंद करतो, अशी माहिती दिली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण वेगळेच असल्याचे दिसून आले. येणाऱया काळात अशाचप्रकारे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू राहिल्यास हलशी आणि इतर भागातील हेस्कॉमच्या सेक्शन अधिकाऱयांना भेटून जाब विचारण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
यावेळी रघुनाथ देसाई, पांडुरंग देसाई, वामन देसाई, साईश सुतार, विशाल देसाई, प्रशांत देसाई, गजानन देसाई, वैभव देसाई, मारुती देसाई, नागो देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबाबत हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी तिरवीर यांनी अनेकदा वृक्ष किंवा फांदी कोसळल्यामुळे समस्या निर्माण होते. अशी माहिती देत येणाऱया काळात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.