विमानतळ निर्बंध शिथिल करण्याची मागणी
प्रतिनिधी /कराड
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे 20 किलोमीटर परिघातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बांधकाम व वृक्षलागवडीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने गुरूवारी नवी दिल्ली येथे हवाई वाहतूक राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष चेअरमन संजीवकुमार यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून ही अट शिथिल करण्याची मागणी केली. दरम्यान, मंत्री सिंधिया व चेअरमन संजीवकुमार यांनी अट शिथिल करण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखवल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या प्रयत्नाने ही भेट झाली.
पत्रकात म्हटले आहे की, मलकापूर शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चे दुतर्फा वसलेले असून शहराची सध्याची लोकसंख्या 45 हजार 100 पेक्षा जास्त आहे. हे शहर कराड शहराच्या दक्षिण बाजूस आहे. मलकापूरपासून कराड विमानतळाचे अंतर 6.1 कि.मी. आहे. कराड विमानतळाचे विस्तारीकरण करण्याच्या अनुषंगाने विमानतळाचे 20 किलोमीटर परिघेय हवाई क्षेत्रामध्ये येणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये नव्याने रहिवाशी व औद्योगिक वापरासाठी बांधकाम परवानगी देणे तसेच वृक्ष लागवडीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नव्याने इमारती बांधण्यावर निर्बंध आले आहेत.
बांधकाम परवानगीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारे विकास शुल्क इत्यादी बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे याचा परिणाम इतर विकास कामावर होणार आहे. पर्यायी शहराचा विकास थांबणार आहे. याअनुषंगाने कराड व मलकापूर शहरामध्ये कार्यरत असणाऱया क्रेडाई या बांधकाम व्यवसायिक संघटनेने निर्बंध शिथील करणेबाबत एअरपोर्ट अथॉरेटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली
यांना निवेदन सादर केले असून, याबाबतचे निवेदन नगरपरिषदेस सुद्धा दिले असून, बांधकाम व्यवसायिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे.
वास्तविक पाहता मलकापूर शहर हे कराड विमानतळापासून दक्षिणेस 6.1 कि.मी. अंतरावर असून, कराड विमानतळाशी मलकापूर शहराचा अर्थाअर्थी संबंध येत नाही. कराड विमानतळाची धावपट्टी ही पूर्व-पश्चिम असून, कराड विमानतळावर लँडिंग होणारे विमान हे पुर्णपणे पूर्व- पश्चिम या दिशेने उतरत असल्याने मलकापूर शहराचा भाग धावपट्टीचे कार्यक्षेत्रासमोर येत नसल्याने मलकापूर शहर बांधकामाबाबत घातलेल्या निबंधाबाबत पुर्नविचार करणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे.
बांधकामांना अडथळा येणार नाही शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत बांधकामांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व संजीवकुमार यांनी दिली. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. त्यांनी मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे.