मसूर-वाटाणा पिके खराब होऊ लागल्याने शेतकरी संकटात
वार्ताहर / किणये
हवामानातील वारंवार होणाऱया बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. यामुळे तालुक्याच्या काही शिवारातील मसूर व वाटाणा पिके खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
यंदा कोरोना महामारीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच अतिवृष्टी झाल्यामुळेसुद्धा पिकांचे नुकसान झाले. रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर शेतकऱयांची आस लागून राहिलेली आहे. मात्र अनेकदा ढगाळ वातावरण व हवामानातील बदलामुळे रब्बीतील पिकेही धोक्यात आली आहेत.
भात कापणीनंतर बहुतांशी शिवारात ज्वारी, मसूर, वाटाणा आदी कडधान्याची पेरणी केली. ही पिके सध्या बऱयापैकी बहरून आलेली आहेत. मात्र हवामानात होणाऱया बदलामुळे पिके खराब होऊ लागली असल्याने शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मच्छे, राजहंसगड, नंदिहळ्ळी, धामणे, येळ्ळूर, बसवण कुडची, सांबरा, निलजी, मुतगा, बस्तवाड, हलगा आदी भागांमध्ये मसूर व वाटाणा पीक घेतले जाते. खरीप हंगामातील सुगी करून ज्या शेतकऱयांनी वाटाणा व हरभऱयाची पेरणी केली होती. या महिन्याभरानंतर बहुतांशी शिवारातील वाटाणा काढणीसाठी येणार आहे. मात्र निसर्गाने शेतकऱयांना साथ देण्याची गरज आहे.