हवामान बदलाचे जागतिक परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. यावर्षी मार्च महिन्यामध्ये मुंबईसह कोकणपट्टीमध्ये उष्णतेची लाट आली आहे. सोमवारी रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक तापमान 39 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. मोठय़ा प्रमाणात झालेला तापमान बदल वेगवेगळ्या घटकांवर परिणाम करणारा ठरला.
कोकणामध्ये आंबा, काजू, मासे अशी नैसर्गिक उत्पादने परंपरागत रितीने होत आहेत. येथील लोकांचा चरितार्थाचा प्रमुख उद्योग शेती हाच आहे. या उद्योगावर हवामान बदलाची संकटे सतत येत आहेत. त्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. लोकांच्या जीवनमानावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत आहे. शेतीशिवाय पशुपालन उद्योगावरही या हवामान बदलाचा मोठा परिणाम कोकणात दिसून येत आहे. येथील शेतकऱयांसमोर यासंदर्भात उपाययोजना करण्याविषयी मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
हापूस आंबा ही कोकणची खासियत आहे. काही वर्षापूर्वी भौगोलिक ओळख असलेले शेती उत्पादन म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे. कोकणात तयार होणाऱया हापूस आंब्यालाच केवळ ‘हापूस’ या नावाने संबोधण्यास कायद्याने मान्यता देण्यात आली. कोकणच्या बाहेरच्या क्षेत्रातील कोणत्याही आंब्याला हापूस हे नाव देण्यात येऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले. यामुळे कोकणबाहेर तयार झालेल्या कोणत्याही आंब्याला आता हापूस असे नाव देता येत नाही. यापूर्वी वेगवेगळ्या गावांची नावे घेऊन त्यापुढे हापूस नाव देत आंबा विक्री होत होती. परंतु त्याला कायद्याच्या पातळीवर मर्यादा घालण्यात आली.
हापूस आंब्याला विशेष स्थान देण्यामागे काही तेवढेच विशेष मुद्दे आहेत. कोकणातील हापूस आंब्यासारखे उत्पादन अन्य ठिकाणच्या जमिनीतून आणि वातावरणातून होत नाही. फळाला येणारी चव विशेष असते. एका बाजूला निसर्गाने हे वैशिष्टय़ दिले असले तरी दुसऱया बाजूने हे झाड अत्यंत नाजूक आहे. या झाडाला थंडी असताना मोहर येतो पण थंडी वाढली तर तो मोहोर करपतो. या झाडावरच्या मोहरावर किटक आणि बुरशीजन्य विकार अधिक प्रमाणात आक्रमण करतात.
हापूस आंब्याचे झाड जसे थंडीसाठी संवेदनशील आहे तसेच उष्णतेसाठीदेखील संवेदनशील आहे. मार्च महिन्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात उष्णता वाढ झाली. साऱया कोकणपट्टीत उष्म्याची लाट यावी त्याप्रमाणे हवामान बदल झाला. हा बदल काही प्रमाणात अनपेक्षित होता. यापूर्वी दोन दिवस ढगाळ वातावरण आणि वाढती आर्दता यामुळे हवामानात बदल जाणवत होता. याचा परिणामदेखील आंबा उत्पादनावर होईल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आर्द्रतेत झालेली वाढ त्याचबरोबर अभ्राच्छादित आकाश यामुळे आंब्याच्या मोहरावर त्याचप्रमाणे फळावर बुरशीजन्य रोगाची भीती वाढली आहे. या काळात रोगापासून बचाव व्हावा म्हणून शेतकऱयांना अधिकची औषध फवारणी करावी लागत आहे. एका बाजूला वाढत्या फवारण्यांमुळे खर्चाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर रासायनिक पदार्थ अधिक प्रमाणात वापरावे लागत असल्याने पर्यावरणीय संतुलनाबद्दल प्रश्न निर्माण होत आहे.
आंब्याच्या उत्पादन खर्चावर हवामान बदलाचा विपरीत परिणाम होत असल्याने आंब्याला अधिक प्रमाणात भाव मिळावा अशी अपेक्षा उत्पादक बाळगून आहेत. व्यवहारामध्ये मात्र आंबा बाजारपेठही व्यापाऱयांच्या ताब्यात आहे. उत्पादक म्हणून शेतकऱयांना बाजारपेठेवर कोणतेही नियंत्रण ठेवता येत नाही. यामुळे प्रतिवर्षी आंबा उत्पादनातून मिळणाऱया निव्वळ नफ्याचे मान कमी होत चालले आहे. बाजारपेठेतील अन्य घटकांमुळेदेखील शेतकऱयांच्या नफ्याचे मान घसरले आहे.
आंब्याच्या सोबत कोकणात काजू उत्पादन महत्त्वाचे आहे. काजूच्या पारंपरिक जातीच्या झाडांना हवामान बदलाचा फटका कमी प्रमाणात बसतो. ही झाडे तापमान बदल किंवा आर्द्रतेशी अधिक चांगल्याप्रकारे जुळवून घेत असतात. कीटक किंवा बुरशीजन्य रोगांना तुलनेत अधिक सबळपणे तोंड देत असतात. तथापि शेतकरी वर्ग मात्र नव्याने संशोधित झालेल्या काजूच्या वाणांची लागवड करत असतो. अधिक उत्पादन क्षमता हे संशोधित वाणांचे वैशिष्टय आहे. शेतकरी त्याकडे आकर्षित होतात. परंतु नवी वाणे पर्यावरण विषयक अधिक संवेदनशील असतात. अधिक थंडी पडली तर संशोधित वाणांच्या काजूचा मोहोर हा करपतो. त्याचप्रमाणे उष्णतेची लाट ही झाडे सहन करु शकत नाहीत. उष्णता वाढल्यास अर्धवट अवस्थेतील फळे गळून पडतात.
काजूच्या झाडांना पर्यावरण बदलांशी अनुकूल बनवण्याचे वेगवेगळे विचार पुढे आले. परंतु सतत बदलणाऱया हवामानाला तोंड देता येईल अशी एखादी कायमची व्यवस्था अद्याप सुचवण्यात आलेली नाही. शास्त्रज्ञ या मुद्यावर काम करत असले तरी काजू उत्पादनासाठी हवामान बदलांवर तोडगा काढता आलेला नाही. शेतकरी वर्ग असे संशोधन मदतगार ठरू शकते अशी अपेक्षा ठेवून आहे. हवामान बदलाचा महाराष्ट्राच्या किनाऱयावरील मत्स्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी राणा मासा, रिबन फिश सारखे मासे अल्प किंमतीतील मासे मोठय़ा प्रमाणात मिळत होते. आता हे मासे कमी मिळत आहेत. चिंगुळ, म्हाकुळ सारख्या अधिक किंमती माशांचे प्रमाण देखील घटले आहे. मासे हवामानातील बदलांप्रमाणे स्थलांतर करत असतात. विशिष्ट ऋतुमध्ये विशिष्ट मासे किनाऱयाला येवून अंडी घालत असतात. बाकीच्या ऋतुमध्ये ते दूरवर समुद्रात जात असतात. माशांच्या स्थलांतरासाठी हवामानातील बदल हा संवेदनशील मुद्दा ठरतो.
कोकणात दुग्ध व्यवसाय मोठय़ा प्रमाणात नसला तरी विशिष्ट पटय़ामध्ये दुधाळ जनावरांचे पालन केले जाते. सध्याच्या उष्णतेच्या लाटेच्या दिवसात गायी म्हशींनी दूध देण्याचे मान धडाधड कमी केले आहे. शेळी, मेंढी पालनाचा अल्प प्रकल्प कोकणात असले तरी तेथेही शेतकऱयांना काळजी घ्यावी लागतेय. अंडी उत्पादन आणि कोंबडी पालन हे मुद्दे कोकणात अजून बाल्यावस्थेत आहेत. तथापि संवेदनशील असलेला हा उद्योग हवामान बदलाच्या संकटाला तोंड देत आहे.
सुकांत चक्रदेव